अर्धापूर (नागोराव भांगे) केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या नियोजन शुन्य कारभारामुळे केवळ बहात्तर दिवसात पेट्रोल मध्ये १६ रूपये व डिजलमध्ये ४ रूपयांची दरवाढ झालेली आहे. या दरवाढीच्या विरोधात अर्धापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. १९ - मंगळवारी आंदोलन करण्यात आले असून याबाबत अर्धापूर तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
भाजप सरकारचे केंद्र आणि राज्यात कसल्याही
प्रकारचे नियोजन राहीले नाही. हे सरकार गोरगरिबांना न्याय देणारे नसून हे फक्त कारखानदार व उद्योगपत्याचा विकास करणारे आहे. मागील १ जुलै २०१७ रोजी पेट्रोलचे दर ६३ रूपये प्रतिलिटर तर डिजलचे दर ५८ रूपये प्रतिलिटर होते. हेच दर १० सप्टेंबर २०१७ रोजी पेट्रोल ७९.४१ तर डिजल प्रतिलिटर ६२ रूपये म्हणजेच केवळ ७२ दिवसात पेट्रोल मध्ये १६ रूपये आणि डिजलमध्ये ४ रूपयांची वाढ झालेली आहे. या पेट्रोल व डिजल दरवाढीचा सर्व भुर्दंड सरकार जनतेवर लादत आहे. या इंधन वाढीमुळे महागाईचा आलेख वेगाने वाढत आहे. त्यामुळे अन्नधान्य, भाजीपाला, दुध व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. याचा त्रास सर्वसामान्य जनतेला सोसावा लागतो आहे. अशा प्रकारचे आरोप निवेदनातून करण्यात आले आहे. अशा प्रकारचे निवेदन दि. १९ - मंगळवारी निवासी नायब तहसिलदार शिवाजी जोगदंड यांना देण्यात आले असून या निवेदनावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशवराव इंगोले, नगराध्यक्षा सौ. प्रणिता सरोदे, नासेरखान पठाण, प्रविण देशमुख, गोविंद सिनगारे, रामराव कदम, अविनाश लढ्ढे, उमेश सरोदे, व्यंकटी राऊत, जब्बार खान पठाण, मारोतराव कानोडे, बालाजी कदम, नगरसेवक काजी गाजी, डाॅ. विशाल लंगडे, पंडित लंगडे, देवानंद इंगोले, शेख मकसूद आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.