खा.राजीव सातव यांनी पाहणी करूनही समस्या जैसे थेच
हिमायतनगर (अनिल मादसवार) तेलंगणा - मराठवाड्याला जोडणाऱ्या हिमायतनगर येथील अंडर ब्रिज पुलाखालून जाणाऱ्या खड्डेमय रस्त्यामुळे अक्षरशा प्रवाशी हैराण झाले आहेत. खासदारांनी पाहणी करून आश्वासन देऊनही खड्ड्याची अवस्था जैसे थेच असल्यामुळे नागरिकांवर जीव धोक्यात घालण्याची वेळ आली आहे.
हिमायतनगर हे तालुक्याचे ठिकाण असून, या
ठिकाणी रेल्वे स्थानक तेलंगणा - विदर्भाच्या प्रवाश्यांसाठी महत्वाचे आहे. तसेच येथील रेल्वे अंडर ब्रिजच्या रस्त्यानेच हैद्राबाद - अकोला मार्ग गेलेला आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून हिमायतनगर शहरातून गेलेल्या रेल्वेअंडर ब्रिज अत्यंत धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर गुडग्यापक्षही अतिशय खोल खड्डे झाल्यामुळे येथून जे जा करणार्यांना जीव मुठीत धरून प्रवेश करावा लागत आहे. तर तेलंगणा राज्यातून येणारी एसटी महामंडळाच्या बसचे व अन्य वाहनाचे पाट्या तुटून मोठे नुकसान होत आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे पायी जाणेसुद्धा जिकरीचे बनल्याने शाळकरी मुली, शेतकरी महिला व वयोवृद्धांना पुढील गावांना जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर एखादा अतिगंभीर रुग्ण, बाळंत महिला शहरात उपचारासाठी आणणे जीवघेणे ठरत आहे. मागील काही महिन्यापूर्वी हिंगोली लोकसभेचे खा. राजीव सातव यांनी तालुक्यात भेट दिलेली. यावेळी काही जागरूक नागरिकांनी सवना, पार्डी, खडकी बा. सह तालुक्यातील रेल्वे अंडर ब्रिज रस्त्याचे प्रश्न मार्गी लावण्याची अग्नी केली. यावेळी त्यांनी खड्डेमय रस्त्याची पाहणी देखील केली. यास तीन - चार महिने उलटले मात्र अद्याप हा प्रश्न मार्गी लागला नसल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ आली आले. तसेच या भागातील अनेक ग्रामस्थानि हा प्रश्न विद्यमान आ.नागेश पाटील आष्टीकर, मा.आ. माधवराव पाटील यांच्या समोरही मांडला मात्र याकडे सर्वानीच दुर्लक्ष केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिक बोलून दाखवीत आहेत. तसेच संबंधित विभाग खड्ड्यामुळे कोणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहे काय..? असे बोलून राजकीय नेत्यांसह रेल्वे व बांधकाम खात्याच्या नावाने बोटे मोडत आहेत. हा जीवघेणा रस्त्याची समस्या संबंधित विभागाचे अधिकारी सोडवतील काय.. याकडे परिसरातील गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
आंदोलनाच्या तयारीत नागरिक
रेल्वेपुल अंडरब्रिज रस्त्यासह तेलंगणा बॉर्डरपर्यंतचा रस्ता खिळखिळा झाल्यामुळे अल्पशा पावसाने सुध्दा रस्त्यावरील वाहतूक ठप्प होत आहे. रस्त्यावर जीवघेने खड्डे व अनेक ठिकाणी खचलेला रस्ता अपघातांना निमंत्रण देत आहे. हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील असून, यासाठीच्या दुरुस्तीची ३२ लाखाची रक्कम पडून आहे. असे असताना संबंधित विभागाचे अभियंता सुधीर पाटील हे याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या खड्डेमय रस्त्यामुळे चार - चौघांचे बळी गेल्यानंतर बांधकाम खाते दुरुस्तीचे काम हाती घेणार आहे काय..? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. तात्काळ रस्त्याचे काम हाती घेऊन दर्जेदार पद्धतीने करावे. अन्यथा पार्डी, वाशी, एकघरीसह तेलंगणा भागातील नागरिक, वाहनधारक लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते बापुराव बोड्डेवार, सत्यवृत ढोले, प्रकाश जाधव, विजय बंडेवार, गजानन राठोड, यासह रस्त्याने ये - जा करणारे गावकरी, नागरिक व शेतकर्यानी दिली.