दोघांना पोलीस कोठडी
नांदेड (एनएनएल) एका वर्षात रक्कम दुप्पट करुन देण्याच्या भुलवणीखाली अनेकांना गंडा घालणाऱ्या साई चिटफंडच्या दोन संचालकांना आज भाग्यनगर पोलिसांनी हैद्राबाद येथे जावून शिताफीने अटक केली. आरोपींनी नांदेडच्या अनेक मंडळींची फसवणूक केली असून हा आकडा 50 लाखापर्यंत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नांदेडच्या नरहर नगरमधील ज्योती केरबा जिंके यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार साई चिटफंडच्या नावाखाली गुंतवणूक करुन वर्षभरात रक्कम दुप्पट देण्याचे आमिष दाखविण्यात आले. याचे संचालक गणेश कमटम व व्यंकटेश रामलू मत्ती यांनी तसेच मुरली चंद्रय्या कमटम व गिरीष उर्फ महेश रामलू या चौघांनी अनेकांची रक्कम गोळा केली. काही कडून एकरक्कमी तर काहींकडून महिन्याकाठी ही रक्कम घेतली जात होती. मात्र कालावधी लोटल्यानंतर दुप्पट रक्कम तर मिळालीच नाही उलट मुद्दल असलेली रक्कम देण्यातही या चौघांनी टाळाटाळ केली. असाच काहीसा प्रकार अनेक मंडळींशी घडून आल्याचे निदर्शनास आले. धोंडीराम हरीभाऊ गबाळे यांचीही अशाच प्रकरणात फसवणूक करण्यात आली होती. ज्योती जिंके यांच्या तक्रारीनंतर अनेक मंडळी या प्रकरणात पुढे आली व त्यांनी आपली फसवणूक झाल्याचे पोलिसांना या तक्रारीत सांगितले. फसवणुकीचा हा आकडा 75 लक्ष रुपयांपर्यंत गेल्यानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला. त्यानुसार सुरुवातीला मुरली चंद्रय्या कमटम व गिरीष उर्फ महेश रामलू या दोघांना भाग्यनगर पोलिसांनी अटक केली होती. या सर्वांची रवानगी यापूर्वीच जेलमध्ये करण्यात आली आहे. उरलेले दोन आरोपी गणेश कमटम रा.फरांदेनगर आणि व्यंकटेश मत्ती रा.दयानंदनगर यांचा शोध सुरु होता. गुप्त माहितीनुसार हे दोन्ही आरोपी हैद्राबादच्या रामगोपाल पेठ येथे एका ठिकाणी लपून बसले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार भाग्यनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी आज पहाटे या दोघांना अटक केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार चिटफंडच्या नावाखाली या मंडळींनी अनेकांची फसवणूक केली असून, ही रक्कम 75 लक्ष रुपयांपर्यंत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आज या दोन्ही आरोपींना जिल्हा न्यायाधीश गिरीश गुरुव यांच्यासमक्ष हजर करुन तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. सरकारी वकील ऍड. नितीन कागणे यांनी पोलिसांच्या वतीने अनेक मुद्यांचे सादरीकरण केले. न्यायाधीश गुरव यांनी या दोघांना 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.