लोहा, प्रतिनिधी .... नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपनी तर्फे विमाधारक शेतकर्यांना देण्यात आलेली रक्कम कर्ज खात्यात वळविण्याचे काम थांबवा अन्यथा लोहा शाखेच्या बँक ऑफ इंडियासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज लोहा शहरातील बँक ऑफ इंडियासमोर आज मंगळवारी धरणे आंदोलन केले सुधारणा न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
याप्रसंगी देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जि.प.चे माजी उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी नमुद केले आहे. नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास शेती पिकांचे झालेले नुकसानीपोटी शेतकर्यांनी स्वतः पैसे भरून पिकांचा विमा काढलेला आहे. सदर विमा कर्जास संरक्षण देणारा नाही. अगर बँकेचा सहभाग नाही. फक्त शेतकर्यांचे खाते बँकेत असल्याने या खात्यात विमा कंपनीने रक्कमेचा भरणा केला आहे. पण बँकेने अरेरावी करत गरीब शेतकर्यांची अडवणूक करीत शेतकर्यांच्या संमतीशिवाय विम्याची रक्कम परस्पर कर्ज खात्यात जमा करीत असल्याने शेतकर्यांत असंतोषाचा भडका उडाला आहे. शेतकर्यांवर होत असलेल्या या अन्यायाविरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने पुढाकार घेत आज लोहा येथील बँक ऑफ इंडिया कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. लोहा तहसीलचे नायब तहसीलदार जायभाये यांनी या धरणे आंदोलनाचे निवेदन स्विकारले असून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी दिले. या धरणे आंदोलनात शिवराज पवार, बाबासाहेब देशमुख, ह.भ.प. आत्माराम महाराज पोलेवाडीकर, सुशिल हरिभाऊ सावंत, स्वप्नील पांचाळ, गोविंद लोंढे, माधव शिंदे, मधुकर शेंडगे, जीवन वडजे, शंकर माने, गजानन कर्हाळे, संदीप पौळ, रामदास मोरे, संजय भुजबळ, शेख पाशा आदी शेतकरी व युवक मोठ्या संख्येत या धरणे आंदोलनात सहभागी होतेे.