हिमायतनगर(प्रतिनिधी)शहरातील नागरिकांना रस्ते, पाणी यासह अन्य नागरी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हि समस्या सोडवून दिलासा द्यावा अशी मागणी करून येथील महिला - पुरुषांनी नागराध्यक्षाना साकडे घातले आहे.
निवेदनात म्हंटले आहे कि, वॉर्ड क्रमांक 3 मध्ये गेल्या 3 महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कारण या प्रभागातील चालू बोअर बंद झाले आहेत. सदर प्रभागात बोअरशिवाय दुसरा पर्याय नाही, येथे भरपूर पाणी असून सुद्धा भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या प्रभागात 80 टक्के लोक हे रोजमजुरी करून जीवन जगणारे आहेत. परंतु पाण्यासाठी मजुरी सोडून वेळ वाया घालावीत भटकावे लागत आहे. या परिसरात रस्ते व नाल्यांचा अभाव आहे, त्यामुळे नालीचे घाण पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने ये- जा करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. या घाणीच्या साम्राज्यामुळे परिसरात साथीच्या आजाराची लागण होण्याची शक्यता बळावली आहे. हि बाब लक्षात घेतात तातडीने आमच्या वस्तीतील पाणी व रस्त्याची समस्या पुढील 8 दिवसात सोडवावी अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करून उपोषणास बसण्याचा इशाराही दिला आहे. यावर स.इब्राहिम स.अहेमद, शे.असलं शे. खय्यूम, शे.जब्बार शे.मौला, रुखमाजी कांबळे, शे.महेबूब मिस्त्री, आकुमार कांबळे, म.इशाराही, इसुब भाई, रशिदा बी, जरीना बी, रुक्सना, राबिया बी, शे.शब्बीर, शे.अमीर, शे.शादूल, शे.अहेमद हुसेन यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
उन्हाळभर सर्वाना पाण्याची टंचाई भासू दिली नाही, परंतु येथील एक बोअर गाळला गेल्याने बंद पडला आहे. आजूबाजूच्या चार पैकी तीन बोअरला पाणी आहे, लवकरच अन्य एका बोअर घेतला जाणार आहे. येथील सिमेंट रस्त्याला मंजूर मिळाली असून, पावसाळा संपताच याचे काम लावकारचा सुरु करण्यात येईल अशी माहिती नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमीद यांनी दिली.
