सव्वा कोटीच्या हिमायतनगर -उमरखेड रस्त्याचे काम रखडल्याने वाहनधारक व नागरिक त्रस्त
हिमायतनगर(अनिल मादसवार)मागील आठ महिन्यापूर्वी सुरु करण्यात आलेल्या सव्वा कोटीच्या रस्त्याचे काम गत सहा महिन्यापासून रखडले असून, रस्त्यावरील गिट्टी उघडी पडल्याने पादचारी भक्तगन व वाहन धारक त्रस्त झाले आहेत. याकडे संबंधितानी तातडीने लक्ष देवून काम मार्गी लावावे अशी मागणी जोर धरत आहे.
स्वातंत्र्याच्या साठीनंतर तालुक्यातील घारपुर - हिमायतनगर रस्ता विकासाच्या प्रतीक्षेत होता. हा रस्ता व्हावा म्हणून घारपुर, दिघी, टेंभूर्णी येथील नागरिकांनी उपोषण, आंदोलने काळी. तेंव्हा कुठे माजी आमदार माधव पाटील यांनी यासाठी १ कोटी २० लाखाचा निधी मंजूर करून आणला. त्यांच्याच हस्ते एप्रिल महिन्यात या रस्त्याचे नारळ फोडून कामाला सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होऊन उमरखेड, यवतमाळ, अकोला, मध्य मार्ग सुरु होऊन दालन वळणात वाढ होऊन हिमायतनगर शहराच्या बाजारपेठेला महत्व प्राप्त होईल असे वाटले होते. परंतु सदर रस्त्याचे काम हे केवळ दीड महिने मजबुतीकरण करे पर्यंत सुरु होते. त्यानंतर पावसाळा आणि लोकसभा - विधानसभा निवडणुका लागल्या. तेंव्हापासून सव्वा कोटीच्या रस्त्याचे काम रक्जाडले आहे. निवडणुका संपून दोन महिने उलटून गेले मात्र अद्याप बांधकाम विभाग व संबंधित गुत्तेदाराने या कडे लक्ष दिले नाही. परिणामी रस्त्यावरील मजबुतीकरणात वापरण्यात आलेली गिट्टी पूर्णतः उखडून वर आली आहे. उखडलेल्या गिट्टीचा रस्ता पार करताना वाहनधारक, बैलगाडी हाकणारे शेतकरी, मजूरदार व याचा रस्त्यावर असलेल्या वरद विनायक, कनकेश्वर, शनिदेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्ताच्या नाके नऊ येत आहेत. वाहन चालविताना रस्त्यावरील गिट्टी उडून लागणे, वाहने स्लीप होणे, तोल जावून पडणे, दुचाकी पंक्चर होणे, अश्या छोट्या मोठ्या घटना नित्याच्याच बनल्या आहेत. त्यामुळे रस्त्याने जाणारे भक्त, शेतकरी व नागरिकावर बांधकाम विभाग व संबंधित गुत्तेदाराच्या नावाने बोटे मोडण्याची वेळ आली आहे.
खरे पाहता हा रस्ता अकोला- निर्मल मध्य मार्ग आहे, याचे काम पूर्ण होतच विदर्भ - तेलंगाना आवक - जावक व दालन वाल्नास्ठी कमी खर्चातला व सोयीस्कर ठरणार आहे. त्यामुळे हिमायतनगर शहराच्या बाजारपेठेला सुद्धा विशेष महत्व प्राप्त होणार आहे. अश्या महत्वपूर्ण रस्त्याकडे विद्यमान खा.राजीव सातव व आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी लक्ष देवून रखडलेल्या रस्त्याचे काम सुरु करण्याच्या सूचना संबंधित विभागास द्यावात. तसेच उर्वरित रस्त्याच्या कामासाठी भरीव निधी उपलब्ध करून विदर्भ - मराठवाडा -तेलंगणाची एकसूत्री नाळ जोडावी अशी मागणी विकास प्रेमी नागरीकातून केली जात आहे.