चातक पक्षाप्रमाणे बळीराजाचे डोळे लागले आभाळाकडे
हिमायतनगर(अनिल मादसवार)मृग नक्षत्र लागून आठवडा उलटला तरी पाऊस पडत नसल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. खरिपाच्या पेरणीसाठी बळीराजाने युद्ध पातळीवर तयारी करून, पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली आहे. मृग नक्षत्र कोरडे जात असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली असून, एका चातक पक्षाप्रमाणे बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागल्याचे चित्र हिमायतनगर तालुका परिसरात दिसून येत आहे.
हिमायतनगर तालुक्यात ३३ हजार २०० हेक्टर जमीन पेरणीयोग्य आहे. त्यापैकी सन २०१२-१३ च्या हंगामात ३४ हजार ६४४ हेक्टर जमिनीवर खरीपाची पेरणी कण्यात आली होती. यात सर्वाधिक पेरा कापसाचा झाला असून, २१ हजार ६७८ हेक्टर मधील शेतकर्यांनी पांढरे सोने उगविले होते. मात्र जुलै - ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने ६० टक्क्याहून अधिक शेतकर्यांना याचा फटका बसला होता. त्यामुळे तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी नागविल्या गेला असून, अस्मानी व त्यानंतर व्यापायांच्या सुलतानी संकटाचा सामना करावा लागल्याने हिमायतनगर तालुक्यातील १० ते १५ शेतकर्यांना आत्महत्या केल्या आहेत. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाला असून, कर्ज फिटले नसल्याने अनेकांनी शेती व्यवसाय सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलून दाखविले आहे. नुकसान भरपाईपोटी शासनाकडून मिळालेली तुटपुंजी मदत शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढू शकली नाही. पिकविलेले शेतीमालाला म्हणावा तास भाव मिळाला नसल्याने पेरणीसाठी केलेला खर्च सुद्धा निघाला नाही, हि बाब सर्व श्रुत आहे. तरीसुद्धा बळीराजा नव्या उमेदीने मागील वर्षी झालेले नुकसान भरून काढण्यासाठी दर वर्षीप्रमाणे तयारीला लागला असून, पेरणीपूर्व मशागतीची सर्व कामे आटोपून पेरणीसाठी सज्ज झाला आहे.
गतवर्षीच्या नुकसानीचा अंदाज घेता बळीराजा नियोजनबद्ध पद्दतीने पेरणी करणार असून, कपाशी बरोबर, सोयाबीनच्या पेर्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर तूर, मुग, उडीद यश अन्य कडधान्याची पिकेही घेतली जाणार आहेत. मात्र गत वर्षीच्या तुलनेत या वर्षी सोयाबीनच्या बियाणात दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले जात आहे. रासायनिक खताचे दरही गगनाला भिडले असून, खाते - बियाणांची जुळवा जुळाव करण्यासाठी बैंक आणि वेळ प्रंसगी साहुकाराचे उंबरवठे झिजवावे लागत आहे. एवढे करूनही खरीपाचे उत्पन्न समाधानकारक येईल कि नाही याची शास्वती नसल्याने शेती वायद्याने देणे फायदेशीर राहील अश्या प्रतिक्रिया काही शेतकर्यांनी दिल्या. तर काही शेतकरी या संकटाचा सामना करून न डगमगता नव्या वर्षाच्या युगात शेती करन्याकडे वळला आहे. अंगाची लाही लाही होत असताना देखील तळपत्या उन्हात पावसाची प्रतीक्षा करीत पेरणीच्या तयारीला लागला आहे.
रोहिण्या कोरड्या गेल्या.. मृगाची सुरुवात झाली नसल्याने पेरण्या लांबणार..!
गतवर्षी तालुक्यात १२०२ मी.मी.पावसाची नोंद झाली होती. तसेच रोहिण्या व मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे वेळेवर पेराण्या आटोपल्या होत्या, मात्र यंदा रोहिण्या पूर्णपणे कोरड्या गेल्या तर मृगातील पावसाची अजूनही सुरुवात झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या नजारा आभाळाकडे लागल्या आहेत. २० जून पर्यंत चांगला पाऊस झाला नाही तर खरिपाच्या पेरण्या सुरु होतील, अन्यथा या वर्षीच्या पेरण्या लांबण्याची शक्यता आहे.