नायगाव| तालुक्यातील मांजरम येथील पाझर तलावाचे काम सन १९७८ साली झाले आहे. जवळपास तलावाचे क्षेत्र २० ते २५ हेक्टर आहे. मागच्या दहा दिवसापासून मुसळधार पावसामुळे हे तलाव पूर्णपणे भरले आहे. मे २०२२ महिन्यामध्ये पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत या तलावाची दुरुस्तीचे काम दर्जाहीन आणि अपूर्ण काम झाले आहे. संरक्षण भिंत फुटण्याची शक्यता असल्यामुळे हे तलाव धोकादायक स्थितीत आहे.
तलाव पूर्ण भरल्यानंतर गावकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धोकादायक स्थितीची माहिती दिली. त्यानंतर अधिकारी व कंत्राटदार थातूरमातूर काम करून तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले आहे. आज रयत क्रांती क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे प्रत्यक्ष तलावाला भेट देऊन पाहणी केली. अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग कटके साहेबांना फोन करून शिंदे यांनी काम करण्याची विनंती केली.
पांडुरंग शिंदे यावेळी म्हणाले की, तलाव पूर्ण भरला असल्याकारणाने सांडवा उताराच्या दिशेने काढणे आवश्यक आहे आणि संरक्षण भिंतीची उंची वाढवणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा हा जर तलाव फुटला ५५० हेक्टर जमीन पाण्याखाली येईल आणि मांजरम गावात पाणी शिरेल अशी गंभीर स्थिती आज तलावाची असताना प्रशासन याकडे लक्ष देत नाही ही दुर्दैवाची घटना आहे प्रशासन योग्य ते पावले उचलावी आणि होणारा धोका टाळावा हीच आमची गावकऱ्यांच्या वतीने मागणी आहे. यावेळी शिवाजी गायकवाड,गोविंद छपरे, भुजंग छपरे उपस्थित होते.