नांदेड। शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदवल्यानंतर / पिक विमा भरल्यानंतर शेतात पेरलेल्या पिकांची ई-पिक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.
शेतकरी पिक पेरणीबाबत स्वयंघोषणापत्र देऊन विमा योजनेत सहभागी होतात परंतू प्रत्यक्ष काही शेतात पेरलेले पिक वेगळे असते. शेतकऱ्यांनी शेतात पेरलेल्या पिकांचाच विमा होणे आवश्यक आहे. विमा घेतलेले पीक शेतात पेरले नसल्यास शेतकऱ्यांचा विमा अर्ज बाद केला जाऊन त्याचे भरलेला विमा हप्ता जप्त केला जातो आणि त्यास विमा नुकसान भरपाईचा कोणताही दावा मिळत नाही.
शेतकऱ्यांनी पिक विमा भरल्यानंतर घेतलेल्या पिक संदर्भात त्यांनी चालू हंगामात ई-पिक पाहणीमध्ये केलेली नोंद ही अंतिम गृहित धरण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी स्वयंघोषणापत्रात नोंदविलेल्या पिकांचीच नोंद वेळेत ई-पिक पाहणीद्वारे करुन घ्यावी.