हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे पारवा येथील एका युवा शेतकऱ्याने सततची नापिकी, सध्याची अतिवृष्टीला आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून मृत्यूला कवटाळले असल्याची घटना आज दि.१५ रोजी उघडकीस आली आहे. राजू पुंजाराम गोटमवाड वय ३८ वर्ष असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
गेल्या १० दिवसापासून हिमायतनगर तालुका परिसरात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे यावर्षी शेतामध्ये पेरणी केलेले पीक वाया गेले. एवढेच नाहीतर गतवर्षी देखील सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांसह मयत शेतकऱ्याचे देखील पीक पूर्णतः उध्वस्त झाले होते. शासनाची कोणतंही मदत मिळली नाही असे असताना देखील यातून सावरत कशीतरी उसनवारी आणून यंदा पेरणी केली. मात्र यावर्षी तर कोवळी पिके असताना अतिमुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतातील पूर्ण पिके पुराच्या पाण्याने जमिनीसह वाहून गेली. पाऊस उघडल्याने युवा शेतकरी पारवा बु.येथे गट नंबर १३९ मध्ये असलेल्या २४ गुंठे जमिनीतील पिकाची पाहणी करण्यासाठी गेला होता. शेतीमध्ये जाऊन पाहणी केली तर पेरणी केलेलं सोयाबीन वाया गेल्याचे दिसले.
अतिवृष्टीने झालेला नुकसानीचा हा प्रकार आणि सततच्या नापिकीच्या चिंतेने शेतकरी व्यतीत झाला होता. त्यातच भारतीय स्टेट बैंक सरसम बु. शाखेकडून घेतलेले ६४ हजारांचे कर्ज कसे फेडावे असा विचार करत होता. याच विचारात असताना राजू पुंजाराम गोटमवाड वय ३८ वर्ष या युवा शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी कोणतेतरी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविली आहे. अशी माहिती पारवा येथील उपसरपंच ज्ञानेश्वर माने यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.