अर्धापूर, निळकंठ मदने| मागील तीन दिवसापासून राज्यात पडत असलेल्या पावसाने रात्रीपासून रौद्ररूप धारण केले आहे. नांदेड जिल्ह्य़ासह अर्धापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे भयंकर स्थिती होत असून तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होवून जनजीवन विस्कळीत होत आहे.
तालुक्यातील भोगाव, खडकी सांगवी, शेलगाव खुर्द, शेलगाव बुद्रुक, देळुब बु., शेनी, लोण, बामणी यासह इतर गावांचा संपर्क तुटलेला आहे. नदी, नाले तुंड भरून वाहत आहे. गावांचा संपर्क तुटल्यामुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या बी.ए./ बी. कॉमच्या सुरू असलेल्या परीक्षेतील दिनांक ९ रोजीच्या सकाळ व दुपार दोन्ही सत्राच्या परीक्षेस अनेक विद्यार्थी मुकले. परीक्षेत मुकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा परीक्षा देण्याची संधी द्यावी अशी मागणी विद्यार्थी व अभ्यास केंद्र करीत आहे.
रवीवारी दिवसभर सुर्यदर्शन झाले नाही,उलट पावसाची रीपरीप सुरुच होती,सलग तिन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना सारखे पुराचे पाणी वाहत असून,पीकांसह जमीन खरडून जाण्याचे प्रकार वाढले आहे,केटी कंन्ट्रक्शन च्या गलथान नियोजनामुळे अनेक शेतात पुरस्दर्श पाणी साचले आहे,ढगाळ वातावरणामुळे पाऊस आणखी पडण्याची शक्यता आहे, प्रशासनाने केवळ भेटी देण्याचे काम केले असून, अद्याप प्रत्यक्ष मदत मिळाली नाही.