हिमायतनगर| नूतन पोलीस निरीक्षकांनी पदभार घेताच शहरात विविध धंद्यांनी डोके वर काढले असून, आता चोरटेही सक्रिय झाले आहेत. एवढेच नाहीतर चोरटे आल्याचे समजल्यानंतर जागी झालेल्या नागरिकांवर चोरटयांनी दगडफेक केल्याचे समोर आले आहे. चोरट्यानी पळसपूर गावात माजविलेल्या धुमाकुळामुळे नागरिकात भीती निर्माण झाली असून, या चोरट्याचा बंदोबस्त करण्याचे नूतन पोलीस निरीक्षका समोर मोठे आव्हान आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, गेल्या काही महिण्यापासून बंद झालेल्या चोरीच्या प्रकाराला पुन्हा एकदा नूतन पोलीस निरीक्षकाच्या आगमनानंतर सुरुवात झाली आहे. दि.१९ जूनच्या मध्यरात्रीला अज्ञात चोरट्यांच्या टोळीने हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपूर येथे धुमाकूळ घातला आहे. मध्यरात्रीला १२.३० वाजेच्या सुमारास दिगांबर वानखेडे यांच्या घराची कडी लावून चोरटयांनी किराणा दुकान फोडून ५० हजार रोख रक्कम घेऊन पळाले. एवढेच नाहीतर चोरट्यानी दुकानातील सामानाची नासधूस करून नुकसान केले आहे.
त्यानंतर चोरट्यानी १.२५ वाजता याच पळसपूर गावातील माधवराव हडसनकर यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान जाग आल्याने माधवराव हडसनकर जागी झाले आणि इतर नागरिकांना आवाज दिल्यामुळे चोरांनी दगडफेक केली त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर २ वाजता अवधुत देवसरकर यांचे दुकान फोडून रोख रक्कम १५ हजार दुकाणातील २५ हजाराचे कपडे घेऊन पळ काढला नागरिक पाठलाग करत असल्याने त्यांच्यावर दगडफेकही केली. चोरी करून पाळणाऱ्या चोरट्यानी गावातील अनेक नागरीकांनी बघीतले असून, या चोरट्यांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा अशी मागणी पळसपूर येथील ग्रामस्थांनी केली आहे.
हिमायतनगर शहरातही मध्यरातरीला चोरट्यानी येथील दत्त नगर भागातील काही घरात शिरून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिक जागे झाल्याचे लक्षात येताच चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. शहरासह ग्रामीण भागात चोरटे सक्रिय झाल्याने पोलिसांनी रास्त्रगस्त वाढविणे गरजेचे असून, चोरट्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरीकातून केली जात आहे.