औरंगाबाद| देशातील AIIMS, IIM, IITs, NIT, IISc, & IISER या शैक्षणिक संस्थांसह भारत सरकार मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्याता प्राप्त संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जातीच्या (नवबौध्दांसहीत) विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेसाठी सन 2021-22 या वर्षाकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.
राज्यातील 100 अनुसूचित जातीच्या (नवबौध्दासहीत) विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. सर्व विभागातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्याच्या उद्देशाने विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळनिहाय 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. पात्र झालेल्या विद्यार्थ्यांस संबंधित विद्यापीठ, संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक, तसेच वसतिगृह व भोजन शुल्कही देण्यात येते. हे शुल्क विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते.
राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडुन राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या शिष्यवृत्तीसाठी पदवी अभ्यासक्रमासाठी इ.12 वीत किमान 55% गुण मिळविणे आवश्यक आहे. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवीत किमान 55% गुण मिळविणे आवश्यक आहे. तसेच कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा सहा लाख आहे. या शिष्यवृत्ती करिता निवड झालेल्या विद्यार्थ्यास भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. सदर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्गाला शिकत असला पाहिजे तथापि पुढील वर्षाचे विद्यार्थी अर्ज करुन शकतात, परंतु त्यांचा विचार प्रथम वर्षाचे विद्यार्थी न मिळाल्यास करण्यात येईल.
या शिष्यवृत्ती योजनेविषयी अधिक माहिती, जाहिरात अर्ज व नियमावली शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर >> जलद दुवे >> रोजगार या मथळ्याखाली प्रसिध्द झालेली आहे. या वेबसाईट वरुन अर्ज डाऊनलोड करुन परिपूर्ण अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दि.11 मार्च, 2022 रोजी सायंकाळी 06.15 वाजेपर्यंत swcedn.nationalscholar@gmail.com या ई मेल वर पाठवून त्याची हार्ड कॉपी पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालाय, 3, चर्च रोड, पुणे 411001 येथे सादर करण्यात यावी.