आत्मदहन आंदोलनामुळे ग्रामसेवकासह भ्रष्टाचारात सामील असलेल्यांवर कार्यवाहीची टांगती तलवार -NNL

 भ्रष्टाचाऱ्यावर गुन्हे दाखल होत नसल्याने बालाजी आलेवाड यांचा आत्मदहनाचा प्रयत्न  



नांदेड/हिमायतनगर| स्वच्छ भारत मिशन रोजगार हमी योजनेत मौजे सवना(ज) ग्रामपंचायत मध्ये झालेल्या गैरव्यवहारात सामील असल्यावर कार्यवाही करण्यास पंचायत समिती प्रशासन टाळाटाळ करत असल्याने ग्रामसेवकासह संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी सवना येथील शिवसैनिक बालाजी अल्लेवाड यांनी आज दि.०९ रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर अंगावर डिझेल  टाकून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान पोलीस व कार्यकर्त्यांनी आंदोलनकर्त्यास ताब्यात घेऊन आत्मदहन करण्यापासून रोकले आहे. यावेळी गटविकास अधिकारी यांनी आगामी १७ तारखेपर्यंत वेळ द्या वरिष्ठांचा अहवाल येताच पुढील कार्यवाही करू असे आश्वासन दिल्याने तात्पुरते आंदोलनास स्थगित करण्यात आलं आहे. एकूणच या आंदोलनामुळे ग्रामसेवकासह भ्रष्टाचारात सामील असलेल्यांवर कार्यवाहीची टांगती तलवार उभी आहे.   

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज येथील ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले आजी-माजी ग्रामसेवक, सरपंच व इतर संबंधितांनी सॅन २०१७ पासून स्वच्छ भारत मिशन रोजगार हमी योजनेत करण्यात आलेल्या अपहार प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न केला आहे. यास पंचायत समिती कार्यालयाचे आजी - माजी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व कर्मचारी यांच्यासह राजकीय वरहस्त असल्याने या प्रकरणातील दोषींना पाठिशी घालण्याचे काम केल्या जात आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मौजे सवना ज. येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा शिवसैनिक बालाजी आलेवाड यांनी यासंदर्भात दिलेल्या तक्रारीनुसार स्वच्छ भारत मिशन रोजगार हमी योजनेतून शौचालय प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे. यामधे तत्कालीन ग्रामसेवक/ सरपंच /उपसरपंच व रोजगार सेवक यांच्या नवावर परस्पर पैसे उचलून अफरातफर करण्यात आला म्हणून मौजे सवना ज. येथील शिवसैनिक बालाजी आलेवाड यांनी मागील काळात तहसील कार्यालयासमोर तीन दिवस आमरण उपोषण केले होते.

तेव्हा मागील गटविकास अधिकारी सुहास कोरेगावकर यांनी स्वतः येथील प्रकरणाची चौकशी करून शौचालय प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचे माजी आ. नागेश पाटील आष्टीकर यांच्या समोर उघड केले. परंतु अचानक त्यांची बदली झाल्यामुळे व मधल्या काळात कोरोणा महामारीमुळे हे प्रकरण जशास तसे थांबले होते. त्यानंतर नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी यांच्या कार्यालयाकडून हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयास दि.२२ सप्टेंबर २०२० रोजी चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा असे पत्र देण्यात आले. मात्र या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी होऊन आरोप सिद्ध झाले असताना देखील  हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयाकडून मौजे सवना ज. येथील स्वच्छ भारत मिशन योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपींना पाठीशी घातले जात होते. 

सर्व प्रकारास भ्रष्टाचाराला अभय देणाऱ्या या अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या विरोधात मौजे सवना येथील शिवसैनिक बालाजी आलेवाड यांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल होणार नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही असे म्हणत दिनांक ९ जून २०२१ रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर १२ वाजता अचानक उपस्थित होऊन अंगावर डिझेल टाकून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली, दरम्यान येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी व शिवसैनिक कार्यकर्त्यांनी आलेवाड याना तात्काळ ताब्यात घेऊन आत्मदहन करण्यापासून रोखले आहे.  

जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत माझा लढा चालू राहील - बालाजी आलेवाड 



ग्रामपंचायतीच्या स्वच्छ भारत योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, यासाठी मी २०१७ पासून लढा देत आहे. हे सिद्ध होऊनही पंचायत समितीची भ्रष्ट अधिकारी कार्यवाहीला टाळाटाळ करता आहेत.  हे अधिकारी - पदाधिकारी यांचे नातलग आहेत कि काय..? याना आदेश येऊनही हे कार्यवाही का करत नाहीत याचा अर्थ कि यांचे सुद्धा हात ओले झालेले आहेत. एवढंच नाहीतर माझ्या सासूबाईंचा फोटो लावून त्यांच्याणवणे सुद्धा निधी उचलून हडप केला आहे. त्यातही चक्क सासऱ्याचे नाव बदलले याचा जाब विचारला तर या अधिकाऱ्याजवळ उत्तर नाही. त्यामुळे मी आत्मदहन करण्याचा मार्ग अवलंबविला, यावर तयांनी वेळ मागितला. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत माझा लढा चालू राहील, त्यांनी जर दिलेल्या वेळेत कार्यवाही झाली नाहीतर जिल्हा परिषद नांदेड पुढे जाऊन आत्मदहन करिन असा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.


 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी