कोरोनामुळे गतवर्षी अनेकांचा झाला होता हिरमोड
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड - किनवट राज्य रस्त्यावरील हिमायतनगर पासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या रामायणकालीन इतिहासाची साक्ष देणारा सुप्रसिद्ध सहस्रकुंड बाणगंगा धबधबा खळखळ वाहू लागला आहे. विदर्भ- मराठवाड्यात सीमेवरून वाहणारा पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा नुकत्याच झालेल्या जून महिन्यातील दमदार पावसाने सळसळ करत वाहू लागला आहे. हि बातमी समजताच पर्यटकांनि सहस्रकुंडची वाट धरली आहे. मागील वर्षी कोरोनामुळे पर्यटकांना या ठिकाणी जात आले नव्हते यंदा मात्र नांदेड जिल्हा अनलॉक झाल्याने पर्यटक सहस्त्रकुंड धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यास जात आहेत.
नांदेड - किनवट राज्य रस्त्यावरील इस्लापूर पासून ४ कि.मी.अंतरावर असलेला सहस्रकुंड धबधब्याचे मनोहारी दृश्य प्रती वर्षी पावसाळ्यात पहावयास मिळते. परंतु मागील अनेक वर्षात पावसाळ्याच्या सुरुवातीला धबधबा पाण्याअभावी पाहत आला नाही. तर दोन वर्षांपूर्वी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यापर्यंत धबधब्याचे दृश्य पर्यटकांना पाहण्यासाठी वाट पहावी लागली होती. त्यामुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला होता. उशिरा का होईना...धबधबा सुरु झाल्याचे समजताच पर्यटकांची गर्दी उसळली होती. तर गतवर्षी कोरोना महामारीमुळे या धबधब्याचे दृश्य केवळ सोशल मोदींवर आलेल्या फोटो आणि व्हिडिओवर पाहून समाधान मानावे लागले होते.
यंदा मात्र मागील वर्षाचे सर्व विक्रम मोडीत काढत मृगनक्षत्रा पासून पावसाचे आगमन झाले. त्यामुले पहिल्याच जून महिन्यातील पावसाने पैनगंगा नदी वाहू लागल्याने नदीवरील मुरली बंधाऱ्याचे गेट उघडण्यात आले आहे. त्यातच रात्रीला वरील ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाच्या हजेरीने धबधब्याच्या दोन्ही धारा थोड्या प्रमाणातच का होईना सळसळ करत वाहू लागल्या आहेत. दि.१४ च्या मध्यरात्रीला झालेल्या दमदार पावसाने इस्लापूर व हिमायतनगर भागातील नाले भरून वाहू लागले. या ओढ्याचे पाणी नदीत मिसळून वाहिल्याने हा धबधबा सुरू झाल्याचे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एकूणच वर्षभरापासून धबधबा पाहण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या पर्यटकांची पाऊले सहस्रकुंड धबधब्याच्या दिशेने आपसूकच वळल्याचे पाहावयास मिळते आहे.
रामायण कालीन अख्याईका असलेल्या या नैसर्गिक धबधब्याचे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची पाऊले या दिशेने वळत आहेत. मागील चार वर्षानंतर पहिल्यांदाच जून महिन्यात सहस्रकुंड धबधबा वाहत आहे. १०० ते १५० फुटावरून पडणारा धबधबा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या विहंगम दृश्याचा आनंद पर्यटक ८० फुट उंचीच्या मनोर्यावरून घेत आहे. संपूर्ण परिसर देखील हिरवा शालू पांघरण्यासाठी सज्ज झाला असून, या धबधब्याच्या काठावर पुरातन कालीन महादेव मंदिर आहे. या ठिकाणी श्रावण मास, दर सोमवारी दर्शनसाठी भक्त येतात. मात्र अद्याप या ठिकाणी पोलिस अथवा मंदिर प्रशासनाने सुरक्ष गार्ड तैनात केला नसल्याने दुर्घटनेची शक्यता बळावली आहे.

