तहसीलदारांची मूकसंमती व तलाठ्याच्या संगनमताने वाळू दादांचा रेतीवर डल्ला

जिल्हाधिकारी अरुण डोंगरे साहेबानी लक्ष देण्याची मागणी 

हिमायतनगर, प्रतिनिधी/                         विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी पात्रातून राजकीय वरदहस्ते असलेल्या वाळू दादांनी रेती चोरीचा प्रकार तहसीलदारांची मूकसंमती व तलाठ्याच्या संगनमताने चालूच ठेवला असल्याची चित्र नदी पात्रातील उत्खननाच्या खांद्यावरुन दिसून येत आहे. याकडे नूतन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे साहेबानी विशेष लक्ष देऊन माफियांच्या मुसक्या आवळाव्या आणि स्वार्थ साधणाऱ्या तहसीलदार, तलाठ्यांची उचलबांगडी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत ठोस कार्यावाहि झाली नसल्यास पर्यावरणप्रेमी नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण मांडण्याच्या तयारीत आहेत. 


याबाबत सविस्तर असे कि, विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी दिवाळीच्यानंतर कोरडी ठाक पडली होती. याचा फायदा घेत राजकीय वरद हस्त असलेल्या विदर्भ - मराठवाड्यातील काही वाळुतस्करानी मोठ्या प्रमाणात रेती उपश्याला सुरुवात केली आहे. उत्खननाचे सर्व नियम धाब्यावर ठेऊन स्थानिक पोलीस पाटील, तलाठी, मंडळ अधिकार्यांसह तहसीलदारापर्यंत माया पोचवून   दिवस - रात्र हजारो ब्रास रेतीचा उपसा करत आहेत. हिमायतनगर तहसिल कार्यालय क्षेत्रात असलेल्या रेणापूर पेंड सोडले तर अन्य कोणत्याही रेंतीपेडाच्या लिलाव झाला नाही. नियमानुसार रेती घाटाचा लिलाव झाल्यानंतरच धक्यावरील रेतीचे उत्खनन करणे क्रमप्राप्त आहे. असे असताना संबंधित मंडल अधिकारी राठोड, तलाठी माने यांच्याशी संगनमत करून रेती धक्यावर जाण्यासाठी राॅयल्टी न भरताच मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने पळसपुर पाकाल पेंड, लिंगापेंड, माणकेश्वर, कोपरा, कोठा तांडा, सिंदगी, डोल्हारी, सिरपल्ली, दिघी, घारापुर, शिवारात १० ते २० ट्रॅक्टर व ५ ते १० लोडेड ट्रकद्वारे रेतीचा रात्रंदिवस उपसा करून शासनाला चुना लावला जात आहे. या रेतीचा उपसा करून रस्ते, बिल्डिंग आदींसह अन्य बांधकामांना पुरवठा केला जात आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी जागोजागी शेकडो ब्रास रेतीचे साठे करून ठेवली जात आहेत. याबाबत अनेकांनी महसुलचे काम करणारे पोलीस पाटील, तलाठी, व मंडळ अधिकारी याना सांगूनही रेतीमाफियांच्या मुसक्या आवळण्याचे सोडून उलट साठा उचलण्याची संधी दिली जात आहे. एवढे सगळे बिनबोभाट व राजरोसपणे चालू असताना हिमायतनगरचे महसूल प्रशासन मात्र मुग गिळून गप्प बसले असून, पोलीस विभागही डोळ्यावर पट्टी बांधून महसूल विभागाला हातभार लावत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरिक करत आहेत.  

मराठवाडा - विदर्भच्या नागरिकांसाठी पैनगंगा नदी ही कामधेनु असून पाणी पातळी व मुबलक रेती साठ्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु गेल्या दहा - पंधरा वर्षाच्या काळात सतत होत असलेल्या रेती उपश्याने पाणी पातळी खालावत चालली आसुन नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या अवस्थेत आल्या आहेत. तसेच विहीरी व बोअरवेल आटल्याने सिंचनाच्या जमीनी ओस पडल्या आहेत. ज्या ठिकाणी डोलणाऱ्या हिरव्या पिकाच्या जमिनीचा उपयोग वाळूचा गोरखधंदा करण्यासाठी केला जात आहे. याचे चित्र नदीकाठावरील पळसपुर, डोल्हारी, हिमायतनगर, कोठा तांडा, एकंबा, घारापुर, दिघी, कामारी शिवारात साठविण्यात आलेला ठिकाणी असलेल्या रेतीवरून दिसून येत आहे.


लिलाव विदर्भातील उपसा मराठवाडा हद्दीतून 
---------------
विदर्भ भागातील काही वाळू घाटाचा लिलाव झालेला आहे, मात्र रेतीचा उपसा सर्रास मराठवाडा हद्दीतून केला जात आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठं मोठे खड्डे पडले असून, नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हि बाब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठ्यांना माहित असताना स्वहित जोपासून वाळू दादांना सहकार्य करीत असल्याचे नदीकाठावरील शेतकरी, पर्यावरण प्रेमी नागरिक सांगत आहेत. हा प्रकार लक्षात घेता हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीच्या रेती धक्क्यावर सुरु असलेल्या वाळूचोरी प्रकाराची नुतन जिल्हाधिकारी यांनी पाहणी करून कार्यवाहीचा बडगा उगारवा अशी मागणी जोर धरत आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी