हिमायतनगर(अनिल मादसवार)मौजे किरमगाव - टेभुर्नी शिवाराला जोडणाऱ्या नाल्यावर दोन महिण्यापुर्वी करण्यात आलेल्या बंधाऱ्याचे काम गुत्तेदाराने अर्धवट ठेवून पलायन केले आहे. त्यामुळे पावसाळ्यातील पाण्याच्या प्रवाहाने बांध फुटून परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीतील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या कंची चौकशी करून नुकसानीची भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती, परंतु अद्यापही या बंधाऱ्याची चौकशी तर सोडाच साधी पाहणी न करता चौकशी गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याने शेतकरी वर्गातून तीव्र सांताप व्यक्त होत आहे. तात्काळ चौकशी करावी अन्यथा येथील शेतकरी उपोषणाचे हत्यार उपसण्याचा तयारीत आहेत.
हिमायतनगर तालुक्यातील किरमगाव परिसरात लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियानातून कासार नावाच्या नाल्यावर लाखोंच्या निधीतून बंधारा उभारण्यात आला. काम करताना संबंधित गुत्तेदार व अभियंता यांनी नाल्याचे सरळीकरण व झाडे - झुडपे न तोडता बंधाऱ्याचे काम थातुर माथूर पद्धतीने केले. खरे पाहता नाल्याच्या चढावर बंधारा उभारणे गरजेचे होते. परंतु गुत्तेदार व अभियंत्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करून केवळ निधी लाटण्याच्या उद्देशाने नाल्याच्या वळणावर बंधारा बांधला. बंधाऱ्याचे काम दर्जेदार पद्धतीने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे असताना अर्धवट ठेवल्यामुळे पहिल्याच पावसात बांध फुटून पिकांसह जमीन खरडून गेली. बंधाऱ्याचे काम गुत्तेदार व अभियंत्यांनी स्वतः आणि आपल्या मर्जीतील एक शेतकऱ्याच्या फायद्यासाठी करून आम्हा शेतकऱ्यांचे नुकसान केल्याने दुबार पेरणीची वेळ आली या कामाची चौकशी करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी. आणि चुकीच्या ठिकाणी थातुर - माथूर पद्धतीने बंधारा उभारणाऱ्या गुत्तेदार व अभियंत्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी येथील शेतकरी श्याम नारखेडे, नेव्हल साहेब यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सुरेश काकांनी, लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
नुकसान भरपाई न दिल्यास न्यायालयात धाव घेणार - नेव्हल
---------------------
गुत्तेदाराने केलेल्या चुकीच्या व अर्धवट बंधाऱ्यामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. याची चौकशी करणे तर सोडाच संबंधितांनी साधी पाहणी केली नाही. नुकसान झाल्याने मागणीचे निवेदन घेऊन लघु पाटबंधारे विभागाकडे गेलो. मात्र त्यांनी निवेदन घेण्यास नकार दिल्याने जिलाधिकारी व संबंहदताना तक्रार दिली. नुकसानीचा मोबदला मिळविण्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब करणार आहोत. यावरही न्याय न मिळाल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचे शेतकरी प्रभाकर नेव्हल यांनी प्रस्तुत बोलून दाखविले.