रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी महिला जखमी
हिमायतनगर(प्रतिनिधी)तालुक्यातील मौजे पोटा बु. परिसरातील पारवा खु. येथील कचरा वेचानिसाठी गेलेल्या एका महिलेवर रानडुकराने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना दि.१० मंगळवारी सकाळी ०८ वाजेच्या सुमारास घडली आहे.
दुष्काळी परिस्थितीने जंगलातील पाणवठे कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधत मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. तर गेल्या काही दिवसापासून वातावरणात झालेल्या बदलाने शेतकर्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरु केली आहे. त्यानिमित्त पारवा खु.येथील महिला शेतकरी सौ. आशाबाई मारोती करडेवाड ह्या कचरा वेचानिसाठी सकाळीच गेल्या होत्या, दरम्यान ८ वाजेच्या सुमारास पळसाच्या झुडपात दाबा धरून बसलेल्या एका रानडुकराने कचर वेचानीत मगन असलेल्या महिलेवर अचानक हल्ला केला. यामुळे घाबरलेली महिला जमिनीवर पडली असताना रानडुकराने महिलेच्या उजव्या पायाला जबरदस्त चावा घेतला. जीवाच्या आकांताने सदर महिलेने आरडा -ओरड केली. यावेळी बाजूलाच नांगरणी - वखरणी करणारे शेतकरी धाऊन आले. दरम्यान रानडुकराने पलायन केले. जखमी झालेल्या महिलेस तातडीने भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार केले. वृत्त लिहीपर्यंत सदर महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
गेल्या काही दिवसापासून तालुक्यातील ग्रामीण भागात रानडुकराचा हल्ला, वाघाचा हल्ला, हरीण विहिरीत पडणे, शिकारी टोळ्या सक्रिय झाल्याचे वृत्त अनेक वर्तमान पत्रातून प्रकाशित झाले. परंतु वनविभागाने याची दाखल घेऊन वन्य प्राण्यासाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय केली नाही. त्यामुळे वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीकडे शिरकाव सुरूच आहे. आता तरी वनविभागाने घटनेचे गांभीर्य घेऊन जंगलात पाणवठे तयार करून नागरिकांना सुरक्षा द्यावी अशी मागणी होत आहे.