सिरंजनी येथील आरोग्य केंद्राच्या सुरक्षा भिंत व सिमेंट बेडचे काम निकृष्ठ
हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील सिरंजनी येथील आरोग्य केंद्राच्या सुरक्षा भिंत व सिमेंट बेडचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले असून, तेही अर्धवट ठेवून गुत्तेदाराने काम बंद केल्याने केंद्रातील साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कामाची चौकशी वरिष्ठांनी करूनच देयके अदा करावीत अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.
विकास्पासून कोसो दूर असलेले हिमायतनगर जिल्हा परिषदेतील सिरंजनी गाव परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधेसाठी येथे आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आले आहे. परंतु जनतेच्या आरोग्याची देव करणाऱ्या केंद्राचीच दुरवस्था झाल्याने याची दुरुस्तीच्या माध्यमातून सुरक्षा भिंत व सिमेंट बेडच्या कामासाठी जिल्हा परिषद उत्तर विभागाअंतर्गत ४ लाखाचा निधी मंजूर झाला होता. सदरचे काम अंदाजपत्रकानुसार व दर्जेदार पद्धतीने करून घेण्याची जिम्मेदारी या भागचे जिल्हा परिषद सदस्य शे.रेहाना बी शे.चंद यांच्याकडे होते. परंतु सदरचे काम करणाऱ्या गुत्तेदाराने शाखा अभियंता मुधोळकर यांच्याशी संगनमत करून लाखोचे काम हजारोत उरकण्याच्या दृष्ठीने नाल्याची माती मिश्रीत रेती, हलक्या दर्जाचे सिमेंट व निकृष्ठ दर्जाचे पाईप द्वारे बनविण्यात आलेले सुरक्षा गेट बसविले आहे. सदरचे काम होताना गावातील काही जागरूक नागरिकांनी या कामाबाबत संबंधित अभियंता यांना सूचना केली होती. मात्र स्वार्थापोटी डोळे असून आंधळ्याची भूमिका सकारात अभियंता मुधोळकर यांनी निकृष्ठ कामाला अभय देत अल्पावधीत काम उरकून घेतले आहे. तसेच या ठिकाणी बांधण्यात आलेल्या सुरक्षा भिंतीचे व बेडचे काम अर्धवट ठेवून काम बंद केले आहे. या बाबतही ग्रामस्थांनी जी.प.सदस्य व अभियंत्यास सूचना केली असता, निधी संपला आहे, पुन्हा मंजूर होताच काम पूर्ण करण्यात येईल असे सांगून हात वर केले आहे.
निकृष्ठ साहित्याच्या वापराने झालेले काम हे अल्पावधीतच उखडून व पडून जाण्याची शक्यता बळावली असून, शासनाचा निधी गिळंकृत करण्याच्या उद्देशाने शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत काम पूर्ण केल्याचा आरोप येथील नागरिकांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना व्यक्त केला आहे. या प्रकाराकडे अधीक्षक अभियंता धारासूरकर यांनी लक्ष देवून सदर निकृष्ठ कामची चौकशी करून हे काम दुसर्यांद दर्जेदार पद्धतीने करून घेवून गुत्तेदारावर दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे. याची चौकशी न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत.
सुरक्षा भिंतीचे काम करताना हि भिंत थेट अंगणवाडी व आरोग्य कंद्र समोर बांधण्यात आली असून, अंगणवाडीच्या बाजूने गेट लावले नसल्याने आरोग्य केंद्रात जाण्यासाठी मोकळी वाट आहे. यातून गुरे -ढोरे आत येत असून, कर्मचारी जर सुट्टीवर गेले तर रात्रीला चोरीची घटना होण्याची शक्यता बळावली आहे. खरे पाहता सुरक्षा भिंतीत अंगणवाडी व रुग्णालय यातील आडवी भिंत बांधून पूर्ण करणे गरजेचे होते असे ग्रामस्थांचे म्हनणे आहे.
या बाबत अभियंता मुधोळकर यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले कि, सदरचे काम हे मंजूर निधी अनुसार पूर्ण झाले असून, चांगले झाल्याचे म्हंटले आहे.