उंटअळीचा प्रकोप

पावसाच्या उघडीपनंतर सोयाबीन, मूग, उडीदावर उंटअळीचा प्रकोप   
हिमायतनगर(प्रतिनिधी) मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसांनंतर गेल्या चार दिवसापासून सोयाबीन, मूग उडीदारावर तीन नमुन्याच्या आळींचा प्रादुर्भाव झाला आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महागडी औषधी फवारणी करूनही उपयोग होत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. 

यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने वेळेवर पेरण्या झाल्या तर नदी - नाल्याच्या काठावरील काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. कशीबशी पिके उगवल्यानंतर गेल्या आठवडयात सतत चार दिवस पावसाची संतधार सुरु होती. त्यामुळे कापूस, सोयाबिन, मूग, उडीद, तूर यासारख्या पिकांना बळ मिळले नाही. त्यामुळे पाणी साचलेल्या काही शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पिवळी पडली तर काहींची उन्मळून गेली आहेत. पिकांचा रंग बदलण्यासाठी फवारणी केली, परंतु याचा उपयोग झाला नाही त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पाऊस थांबल्यानंतर मिळालेल्या उघडीपने पिके वाऱ्यावर डोलताना पाहून शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. परंतु गेल्या चार दिवसापासून सोयाबीन, मुग, उडिदाच्या पिकावर पाने कुरतडणाऱ्या उंटअळी, हिरवी आळी व केसाळ आळी या तीन प्रकारच्या   अळ्यांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे पिकांची अवस्था अत्यंत नाजूक झाली असून, आळ्या व किड्यांनी पाने कुर्तडल्यामुळे पिकांच्या पानाची चाळणी झाल्याचे चित्र शिवारात दिसून येत आहे. अगोदरच गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी पिकांच्या नुकसानीमुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबला. यंदा चांगले उत्पन्न येईल ही अशा बाळगत असताना पिकांवर झालेल्या अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे हवालदिल झाला असून, पिकाच्या उत्पादनात घट होण्याच्या चिंतेने अडचणीत आला आहे. 

2013 मध्ये अश्याच अतिवृष्टीच्या फटक्याने शेतकरी अडचणीत आले होते, त्यावेळी सप्टेंबर महिन्यात सोयाबीनला शेंगा लगडल्यानंतर त्या शेंगातून बीजांकुर फुटू लागल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनला बगल देऊन कपाशीची लागवड केली. दोन वर्ष अल्प पर्जन्यमानामुळे कापसाला धोका झाल्याने यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीवर भर दिला. परंतु आता सोयाबीनसह अन्य पिकावर अळ्यांचे आक्रमण वाढत असल्याने निसर्ग सुद्धा शेतकऱ्यांना साथ देत नाही असेच म्हणण्याची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेता यावर अंकुश मिळविण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांवर होत असलेल्या उंटआळी व किडीच्या प्रादुर्भावर केल्या जाणाऱ्या उपपयोजनांची माहिती देऊन चिंतातुर झालेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून दिलासा द्यावा अशा मागणी केली जात आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी