स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ...... NNL


प्रस्तावना :
भारताच्या स्वातंत्र्याचे यंदाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. ज्ञात-अज्ञात अनेक क्रांतिवीरांच्या क्रांतीकार्यामुळे जुलमी इंग्रजांच्या तावडीतून भारताची मुक्तता झाली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीकारकांनी ‘वन्दे मातरम्’चा जयघोष करत प्राणार्पण केले. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी योगदान दिलेल्या प्रत्येकां प्रती कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी कमीच आहे. आज भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे; पण तो साजरा करताना राष्ट्ररक्षण करण्याचा निश्चय करून तो साजरा करणे  अपेक्षित  आहे. 

राष्ट्राचे रक्षण करण्याचा निश्चय करून स्वातंत्र्यदिन साजरा करूया !

आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांच्या 150 वर्षांच्या गुलामगिरीतून आपल्या देशाला सोडवले. यामुळेच आपण स्वातंत्र्यदिनाचा हा सोहळा साजरा करू शकत आहोत. इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडातून आपल्या देशाची मुक्तता झाली, याची आठवण म्हणून दरवर्षी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो.

भारत स्वतंत्र होण्याआधी मुघल, पोर्तुगीज, आदिलशहा, कुतुबशहा व इंग्रज यांसारख्या अनेकांनी भारतावर राज्य केले. या सर्वांनी भारतातील स्वार्थी व फितुर यांना हाताशी धरून स्वातंत्र्यसैनिकांवर जुलूम करून राज्य केले. व्यापार करण्याच्या निमित्ताने इंग्रज भारतात आले. अशा मूठभर इंग्रजांनी लाखोंची संख्या असलेल्या आपल्या देशावर 150 वर्षे राज्य केले. आपल्यात एकी नसल्याने इतक्या कमी संख्येने आलेले परकीय आपल्यावर राज्य करू शकले.

आपल्यावर दुसरे कोणीतरी राज्य करत आहेत; ते जुलमी आहेत, हे लक्षात येऊनही केवळ आपल्यात राष्ट्रप्रेम नसल्याने, एकजूट नसल्याने हे परकीय आपल्यावर राज्य करू शकले. भारतातील लोकांमध्ये  राष्ट्रप्रेम, स्वराज्याबद्दल आदर, एकजूट हे गुण नसल्याने किंवा योग्य त्या वेळी या गुणांचा वापर न झाल्याने आपल्याला पारतंत्र्यात रहावे लागले.

भारताचा इतिहास पाहिला, तर तो अत्यंत उज्ज्वल आहे. त्यातून आपण खूप काही शिकू शकतो. यासाठी शिवाजी महाराजांचे उदाहरण सर्वोत्तम आहे. अतिशय लहान वयात त्यांनी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या मावळ्यांना हाताशी घेऊन स्वराज्याच्या स्थापनेची शपथ रोहिडेश्‍वराच्या देवालयात घेतली. त्यानंतर एकेक मावळा तयार केला व त्यांच्याकडून भवानीदेवीची उपासना करून घेतली. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या राज्याची स्थापना करतांना त्यांनी ‘श्रींचे राज्य आहे’,  हाच विचार मनात ठेवून राज्य स्थापन केले.

दुसरे उदाहरण लोकमान्य टिळकांचे आहे. भारत पारतंत्र्यात असतांना ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’,अशी गर्जना करत त्यांनी भारतीय जनतेला जागे केले. स्वातंत्र्यवीर सावरकर, वल्लभभाई पटेल तसेच इतर क्रांतिकारक अन् स्वातंत्र्यसैनिक यांच्यामुळे भारत स्वतंत्र झाला.

सध्या आपण स्वतंत्र भारतात रहातो. आज आपल्याला कोणते चित्र दिसत आहे तर सध्या सगळीकडे दहशतवाद पसरला आहे. भारताच्या काश्मीर, पंजाब, गुजरात, सिक्कीम या राज्यांत सीमेलगतच्या देशांची आक्रमणे होत आहेत. दररोज अतिरेकी मोठ्या प्रमाणावर देशात घुसखोरी करून अतिरेकी  आहेत. दहशतवाद्यांनी दिलेल्या धमक्यांमुळे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी यांसारखे राष्ट्रीय सणही आपल्याला कडेकोट पोलीस बंदोबस्तात साजरे करावे लागतात. अशामुळे आपला भारत देश खर्‍या अर्थाने स्वतंत्र आहे का ? सुरक्षितता आपल्याला लाभते आहे का ? असे प्रश्न निर्माण होतात. यासाठीच आपल्याला राष्ट्राभिमान व धर्माभिमान जोपासणे आवश्यक आहे.

राष्ट्राभिमान जोपासण्यासाठी करावयाच्या कृती / प्रयत्न  ध्वजाचा मान राखूया

15 ऑगस्ट अन् 26 जानेवारी या राष्ट्रीय दिनांच्या दिवशी लहान आकारातील कागदी राष्ट्रीय ध्वजांची विटंबना मोठ्या प्रमाणावर केली जाते. लहान मुलांसह अनेक व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साह यांच्यापोटी हे ध्वज खरेदी करतात. हे ध्वज कशाही पद्धतीने लावले जातात. काही दिवसांनंतर हेच ध्वज फाडून रस्त्यावर, कचराकुंडीत व इतस्तत: टाकले जातात. हे सर्व करत असतांना आपण राष्ष्ट्रध्वजाचा म्हणजेच राष्ट्राचा अवमान करत असतो.अशी अयोग्य कृती होणार  नाही यासाठी प्रामुख्याने प्रयत्न व्हायला हवेत.आपणच आपल्या ध्वजाचा मान राखायला हवा. इतरांकडून अशा तर्‍हेने ध्वजाचा अवमान होत असेल, तर त्याविषयी आपण त्यांना सांगूया व आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया. 15 ऑगस्ट  नंतर इतरत्र पडलेले ध्वज आपण उचलून ठेवूया. याबाबत आपण समाजाचे प्रबोधन करूयात. 

राष्ट्रीय सणांच्या दिवशी स्वातंत्र्यवीरांनी राष्ट्रासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण ठेवून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणे - 15 ऑगस्ट या दिवशी सकाळी ध्वजवंदन करायला हवे. हल्ली बहुतेक ठिकाणी सुट्टीच्या या दिवशी सहल काढणे,घरातच दूरदर्शनचे कार्यक्रम पाहणे,उशिरापर्यंत झोपणे अश्या कृती होताना लक्षात येते. त्याऐवजी स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यवीरांची व क्रांतिकारकांची आठवण ठेवून त्यांच्यातील ज्या गुणांमुळे त्यांनी स्वातंत्र्याचा लढा दिला, ते गुण आपल्यात आणण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे यामुळे राष्ट्राभिमान वाढण्यासमदत होईल. 

आपले मन कणखर होण्यासाठी नामस्मरण करणे आवश्यक आहे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर या देशभक्तांनी स्वत.च्या शरीराबरोबर स्वत:चे मनही कणखर होण्यासाठी प्रयत्न केले. आपले मन कणखर असेल, तर आपण कोणत्याही प्रसंगाला धैर्याने सामोरे जाऊ शकतो. मन कणखर बनवण्यासाठी आपल्यात आत्मविश्‍वास निर्माण होणे आवश्यक आहे.

त्यासाठी आपण आपल्या आवडत्या देवतेची आठवण सतत ठेवायला हवी. दिवसभरात काही वेळ तरी आपण देवाचे नाव घेतले पाहिजे.सतत नामसमरण करण्याचा प्रयत्न करायला हवा.  जातांना-येतांना, जेवतांना, दूरदर्शनवरील कार्यक्रम पहातांना, ज्या वेळेत आपण विशेष महत्त्वाचे काम करत नसू, त्या वेळी मनातल्या मनात आपण नामस्मरण करू शकतो. देवाचे आशीर्वाद असतील, तर कोणतीही गोष्ट करणे अवघड नसते. त्यासाठी प्रत्येक गोष्ट करतांना देवाचे स्मरण करून ते करू शकतो.

शरीर सुदृढ रहाण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक - 

सध्याच्या काळात मनाच्या कणखरतेप्रमाणे आपण आपले शरीरही कणखर बनवणे आवश्यक आहे. यासाठी दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने दररोज सूर्यनमस्कार घालणे आवश्यक आहे.

स्वत.मध्ये नैतिक मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न करणे - 

प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करणे, प्रामाणिकपणे करणे, सत्य बोलणे, वडीलधाऱ्यांच्या आदर राखणे, त्यांना उलट उत्तरे न देणे यांसारख्या गोष्टी म्हणजेच नैतिक मूल्ये आपण आपल्यात रुजवणे आवश्यक आहे. आपण या गोष्टी करतो ना, याकडे आपले लक्ष हवे. यावर्षी हर घर तिरंगा यानुसार उपक्रमांचे आयोजनानुसार  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशात साजरा होणार आहे हि एक आनंदाची पर्वणीच आहे. परंतु हे सर्व करत असताना आपल्या राष्ट्रीय अस्मितेचा कुठे अनादर  होणार नाही याची काळजी घेणे आणि असे होत असेल तर जागरूक राहून त्याला प्रतिबंध करणे हे हि तितकेच महत्वाचे आहे. चला तर मग आपण सर्वानी राष्ट्रीय प्रतीकांचा मन राखून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा आनंद घेऊया. 

सौजन्य - हिंदू जनजागृती समिती, 

संकलक - कु. प्रियांका लोणे , संपर्क - 8208443401  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी