मुंबई| अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये पाचडोंगरी आणि कोयलारी गावात विहिरीतील दूषित पाणी पिण्याने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले आहे.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील पाचडोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी प्यायल्यामुळे 50 जणांना अतिसाराची लागण झाली. या दुर्घटनेत तीन नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ दखल घेत दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तत्काळ अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. दूषित पाण्याने बाधा झालेल्या व्यक्तींना तातडीने चांगले उपचार मिळवून द्यावेत. आवश्यक असल्यास त्यांना खाजगी, मोठ्या रुग्णालयात दाखल करावे, असे निर्देश दिले होते. याशिवाय हे दूषित पाणी पिऊन आजारी पडलेल्याना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार देण्याचे देखील त्यांनी निर्देश दिले आहेत.