स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या फर्ग्यूसन महाविद्यालयातील रहात्या खोलीची हिंदु जनजागृती समितीकडून स्वच्छता -NNL

मान्यवर व विद्यार्थ्यांची उपस्थिती !


पुणे|
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तिथीनुसार असलेल्या जयंतीनिमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे येथे ‘क्रांतिकारक स्मारक स्वच्छता’ मोहीम राबवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर येथील फर्ग्यूसन महाविद्यालयात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या रहात्या खोलीची २१ मे या दिवशी सामूहिक स्वच्छता करण्यात आली. 

या मोहिमेत शिरोळे घराण्यातील वंशज श्री. अभयराजे शिरोळे, झुंझ प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. मल्हार पांडे, इतिहास संशोधक श्री. देवाशिष कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगढ राज्य संघटक श्री. सुनील घनवट, फर्ग्यूसन महाविद्यालयातील 30 विद्यार्थी, 10 कर्मचारी यांसह हिंदु जनजागृती समितीचे 9 कार्यकर्ते उपस्थित होते. खोली स्वच्छता करण्यापूर्वी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ज्या खोलीतून स्वातंत्र्य क्रांतीची बीजे रोवली गेली ते्थून राष्ट्र-धर्मचे कार्य करण्याची ऊर्जा आणि चैतन्य आम्हाला मिळो, अशी सामूहिक प्रार्थना या वेळी करण्यात आली.


या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या वेळी श्री. मल्हार पांडे यांनी सांगितले की, स्वा. सावरकर या ठिकाणी असतांनाच त्यांनी स्वदेशी चळवळ, विदेशी कपड्यांची होळी आदि क्रांती चळवळी राबवल्या. विद्यार्थ्यांनी रोज येथे येऊन माथा टेकवून स्फूर्ती घेतली पाहिजे. श्री. देवाशिष कुलकर्णी म्हणाले की, सावरकरांचे कारागृहातील खडतर जीवन आणि त्या स्थितीतही त्यांचे मनोबल कधीच खचले नाही. आजच्या पिढीने मनोबल कणखर करण्यासाठी सावरकरांकडून प्रेरणा घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी सावरकर साहित्य वाचले पाहिजे.

या वेळी श्री. सुनील घनवट यांनी सांगितले की, महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना स्वा. सावरकरांच्या या खोलीची माहिती नाही. ती माहिती सर्वांना करून घेतली पाहिजे. सावरकर म्हणजे शौर्य, सावरकर म्हणजे धाडस, सावरकर म्हणजे तत्त्वनिष्ठता हे विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे. सावरकरांना केवळ विज्ञानवादी दाखवण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे; मात्र ते प्रखर हिंदुत्ववादी होते हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. सावरकरांनी मार्सेलिसमध्ये मारलेली उडी त्रिखंडात गाजली. अभिनव भारत संघटनेची स्थापना करून अनेक क्रांतीकारकांना त्यांनी दिशा दिली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी प्राणांचे बलीदान दिले त्याचे मोठे योगदान आहेच, पण ज्यांनी देश स्वातंत्र्य होण्यासाठी प्रार्थाना केली त्यांचेही योगदान आहे, असे स्वा. सावरकर म्हणाले होते, असेही त्यांनी या वेळी सांगितले. या ‘क्रांतिकारक स्मारक स्वच्छता’ मोहिमेत अधिकाधिक हिंदु युवक-युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री. सुनील घनवट, राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड,(संपर्क : 70203 83264)

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी