किनवट, माधव सूर्यवंशी| तालुक्यात मागील सुमारे ४ वर्षापासुन निर्माणाधिन असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ A हा नेहमी विवादामुळे चर्चेत असुन किनवट ते हिमायतनगर या टप्प्यातील कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे मागील काळात ४ ते ५ नागरीकांचा बळी गेला आहे. अशीच घटना काल दिनांक १५ मार्च रोजी रात्री घडली असुन, दुधगाव जवळील पुलाजवळ दुचाकीवरुन प्रवास करतांना बालाजी नागरगोजे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यु झाला.
कारण या मार्गावरील कंत्राटदाराने रस्ता निर्माणा दरम्यान नियमांचे पालन न केल्याने अशा घटना होत आहेत. यामुळे या निष्काळजीपणा दाखवणा-या कंत्राटदारावर भा.द.वी प्रमाणे कलम २९९, ३०१, ३०४, व ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करुन सदोष मनुष्यवधाची कारवाई करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन भाजप तालुका अध्यक्ष संदिप केंद्रे यांनी किनवट पोलिस स्टेशनला दाखल केले आहे.
किनवट ते हिमायतनगर या मार्गामुळे याभागातील नागरीक त्रस्त असुन अनेकांनी जिव गमावला आहे, या विरुध्द काही दिवसापासुन अनेक राजकिय व सामाजिक संघटनानी आक्रमक भुमिका घेतलेली असतांनाच बोधडी परिसरातील बालाजी नागरगोजे या तरुणांचा अपघाती मृत्यु झाल्याने नागरीकांच्या सयंमाचा बांध केव्हाही तुटुन उद्रेक होऊ उठण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपा तालुका अध्यक्ष संदिप केंद्रे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे या मार्गाच्या आंदोलनाला गती मिळेल हे मात्र तितकेच खरे आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या निर्माणा दरम्यान आवश्यक नियम पाळले जाने आवश्यक असतांना तेथिल कंत्राटदाराकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे जसे दिशादर्शक फलक लावणे, कामचालु असल्याची सुचना लावणे, वळण मार्ग काढला आहे तर तो दिवसा व रात्री हि दिसेल अशा सुचना या मार्गावर लावणे असे नियमांचे पालन करणे आवश्यक असतांना तसे कोणत्याही नियमांचे पालन केले जात नसल्याने नागरीकांचा नाहक बळी जात असल्याने संबधित गुत्तेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद व्हावा अशा आशयाची तक्रार भाजपा तालुका अध्यक्ष संदिप केंद्रे यांनी किनवट पोलिस स्टेशन मध्ये दाखल केली आहे.