भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना अन्ययसाधारण महत्व असले तरिही राजमाता जिजाऊ,पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या कार्य व कर्तत्वानंतरच खऱ्या अर्थाने पुरुष व महिला समानता अस्तित्वात आली.सोबतच,महिलांना त्यांच्या कार्य व कर्तत्वाची जाणीव होऊन आज त्यांनी प्रत्येक क्षेत्रांत आपला वेगळा ठसा उमटविला आहे.त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक,माजी केंद्रीय कृषिमंत्री, खा.शरदचंद्र पवार व खा.सुप्रियाताई सुळे यांच्या महिला आरक्षण व सक्षमीकरण याबाबत आग्रही भूमिकेतून महिलावर्गाला निश्चितच मोठे बळ मिळालेले असल्याने त्यामुळेच आज सामाजिक, राजकीय क्षेत्रांतच नव्हे तर,प्रत्येक क्षेत्रांत महिलांचा वरचष्मा असून अशा कर्तबगार महिलांत प्रामुख्याने एँड.कल्पनाताई डोंगळीकर यांचा नामोल्लेख करावा लागेल. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांना प्रथमतः मंगलकामना व्यक्त करुन त्यांच्या कार्य व कर्तत्वाची माहिती थोडक्यात सर्वदूर पोहचविण्यासाठी लेखनातून केलेला हा प्रपंच...
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात बेटमोगरा या गांवी कल्पनाताई यांचा दि.५ एप्रिल १९७० रोजी जन्म झाला.वडील किशनराव व आई कौशल्याबाई आणि सुनीताबाई या दोंघींनीही दिलेल्या मायेची व सुंसंस्काराची शिदोरी घेऊन मुखेडच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचे धडे घेतले.सन् १९८३ मध्ये चंद्रकांत डोंगळीकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या असल्या तरीही माहेर व सासरच्या मंडळीच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षणाची जिद्द उराशी बाळगलेली असल्याने त्यांनी विवाहानंतर पुढल्याच वर्षी शालांत प्रमाणपत्र परिक्षा देऊन मराठवाडा विभागातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला. त्यांच्या गुणवत्तापूर्ण प्रणालीवर पूनश्च शिक्कामोर्तब करित पती चंद्रकांत यांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा दिल्यानेच त्यांनी विवाहानंतर शालांत परिक्षेसह तद्नंतर लातूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतले तर,वडील किशनराव यांचा समर्थ वारसा चालविण्यासाठी नांदेडच्या विधी महाविद्यालयातून वकिलीचे शिक्षण पूर्ण केले.
वडील किशनराव व काका माधवराव यांच्यामूळे बालपणापासूनच घरात सामाजिक व राजकीय कार्याचे बाळकडू मिळालेले असल्याने व पतीच्या सहकार्याने आपल्या कार्याला त्यांनी कर्तव्य समजून प्रारंभ केला.मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या नांदेड जिल्हाध्यक्षा म्हणून त्यांनी प्रारंभी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले.संघटन कौशल्याच्या बळावर महिला सक्षमीकरणासाठी त्या तत्पर बनल्या.परंतू,सामाजिक कार्याला राजकारणाचीही जोड असावी या उद्देशाने त्यांनी समाजकारणातून राजकारण करण्यास सुरुवात केली. त्यातच,राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार व खा.सुप्रियाताई सुळे यांच्या पुरोगामी तसेच, महिला सक्षमीकरण आदींसाठीच्या प्रेरणादायी विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.
तत्कालीन जिल्हाध्यक्षा डॉ.शीलाताई कदम यांच्यासमवेत पक्षात महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा म्हणून काम करित त्यांनी पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहचवित पक्ष संघटनवाढीसाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नांना बळ देत त्यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा म्हणून काम करण्याची संधी मिळाली सन् २००६ ते २०१६ असे तब्बल दहा वर्षांत त्यांनी आपल्या कुशल कार्य व कर्तत्वाची चूणूक दाखवून दिली.त्यामुळे त्यांना पक्षाच्या महिला आघाडीत प्रदेश सरचिटणीस म्हणूनही कामाची संधी मिळाली.नांदेड जिल्ह्यात व संबध महाराष्ट्रात त्यांनी केलेल्या कार्याची नोंद घेऊन त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्या या पदावर नियुक्त करण्यात आले.सोबतच,लातूर जिल्हा पक्षनिरिक्षक म्हणूनही त्या सद्या यशस्वी रित्या काम करित आहेत.महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीचे कार्य सोबतच, पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्य तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्यासह त्या अग्रेसर असतातच, महत्त्वाचे म्हणजे जनहितांसाठीच्या समस्या निवारणार्थ प्रसंगी अनेक जनांदोलनात त्या अग्रक्रमी असतात.
राजकीय कार्य करतांनाच त्यांनी समाजकारणातून राजकारणाचे उराशी बाळगलेले ध्येय पूर्णत्वास नेण्याचे कार्य सातत्याने सुरुच ठेवलेले आहे. यशस्विनी अभियानाच्या समन्वयीका त्याचबरोबर, राष्ट्रमाता जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था,तुळजामाता महिला मंडळ व शारदा महिला मंडळाच्याही त्या संस्थापक अध्यक्षा आणि उड्डाण ग्रुप च्या उपाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत.गोरगरीब,सर्वसामान्य होतकरु व गुणवंतांना शिक्षणाचे द्वार खुले करुन देत शंकर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करुन त्यांनी त्या माध्यमातून विशेषतः मुलींना तांत्रिक व व्यवसाय शिक्षणाचे धडे मिळावेत यासाठी सुनिती नर्सिंग स्कुल व गंगाई टेक्नीकल इन्स्टिट्यूट निर्माण केल्याने अनेक मुलींची गुणवत्ता सिद्ध झाली आहे.
ग्रामीण भागातून आल्याने त्यांना बालपणापासून असलेल्या क्रिडा क्षेत्राची आवड जोपासीत नांदेड जिल्हा महिला क्रिकेट व फुटबॉल असोशियशन च्या उपाध्यक्ष म्हणून त्या यशस्वीपणे कामकाज पाहत आहेत. सातत्याने प्रत्येक समाजघटकांसाठी त्या विविध उपक्रम राबवित असतात.सर्वसामान्य कुटूंबातील अनेक होतकरू,गुणवंत विद्यार्थी- विद्यार्थिनींनाही त्या वेळोवेळी मदत करीत असतात.तृतियपंथियांसाठीही एक स्तुत्य उपक्रम नांदेड मध्ये त्यांनी नुकताच राबविला होता. सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,सहकार,क्रिडा आदी विविध क्षेत्रांत त्या सदैव मुली व महिलांच्या सक्षमीकरणासाठी अहोरात्र परिश्रम घेत असतात.
कल्पनाताईंच्या प्रेरणादायी कार्याची नोंद घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्काराने सन् २००५ मध्ये सन्मानित केले असून हिरकणी पुरस्कार, नांदेडच्या महिला भुषण अशी एक ना अनेक पुरस्कारांची नोंद त्यांच्या नांवे आहे.करत असलेल्या प्रत्येक क्षेत्रांत कामांची ओढाताण असतांनाही त्यांनी पाटबंधारे विभागात अभियंता या पदावर कार्यरत असलेल्या पती चंद्रकांत पाटील डोंगळीकर यांच्या यशस्वी सहकार्यातून आपली कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे पेलत असून तिन मुले व एक मुलगा अशी त्यांची चारही अपत्ये उच्च शिक्षित आहेत.पहिल्या मुलीने वकिलीचे,दुसरीने एम.बी.ए.चे शिक्षण घेतले आहे.तर,तिसरी मुलगी सद्या उप कार्यकारी अभियंता म्हणून शासकीय सेवेत असून मुलगाही अभियांत्रिकी शिक्षणाचे धडे गिरवत आहे.
नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर,संबंध महाराष्ट्रात सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,सहकार आदी प्रत्येक क्षेत्रांत प्रतिष्ठित,सुसंस्कृत आणि एकत्रित कुटुंब म्हणून बेटमोगरेकर परिवार सर्वदूर सुपरिचित असून घरातील सर्व वडिलधाऱ्या मंडळींपाठोपाठ बंधू माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बळवंतराव पाटील बेटमोगरेकर तसेच,वहिनी सौ.सुशिलाबाई हणमंतराव पाटील बेटमोगरेकर ह्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास समितीच्या सभापती आदी एक ना अनेक जण त्यांच्या परिवारात व अनेक सगे सोयरेही राजकीय आणि विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य असले तरिही समाजकारणातून राजकारणात सुरु असलेला कल्पनाताईंचा यशस्वी प्रवास मात्र स्वकर्तत्वावरच असल्याचे मला स्वतः अनुभवायला मिळाले.
स्त्री म्हणजे वात्सल्य..
स्त्री म्हणजे मांगल्य..
स्त्री म्हणजे मातृत्व अन्..
स्त्री म्हणजेच कर्तव्य..
असं आपण आजही अभिमानाने म्हणतो. सोबतच,स्त्री - पुरुष समानतेचा जागर करुन कर्तबगार महिलांचा निश्चितच योग्य तो सन्मान राखला जातोय.हि मोठी उपलब्धी असल्याचे मानले जाते मात्र तसे मूळीच दिसून येत नाही.कारण समानतेच्या या प्रवाहात आजही महिलांचे स्थान पुरुषांच्या बरोबरीने नाही. अपवाद सोडला तर,बहुतांश ठिकाणी समाजकारण,राजकारणात पारंगत असलेल्या व नसलेल्याही प्रतिष्ठितांच्या कुटुंबातीलच अनेक महिला आज केवळ भारतीय संविधानामूळे मिळालेल्या आरक्षणातूनच विशेषतः राजकारणात विविध पदावर कार्यरत आहेत.
परंतू,त्यांच्या कुटूंबातील काही पुरुष मंडळी मात्र शासन नियमांना डावलून स्वतःला त्यांचे प्रतिनिधी म्हणून लोकांतच नव्हे तर, शासकीय कामकाजातही हस्तक्षेप करुन मिरवत असतात. मात्र,तरिही स्वतःचा सन्मान राखण्यासाठी घराचा उंबरठा ओलांडताना रुढी,परंपरा व स्त्री असल्याची जाणीव ठेवूनच स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेक महिला आज जोमाने कार्यरत आहेत.त्यातच,कल्पनाताई ह्या नक्कीच अग्रक्रमी.परंतू,अनेक क्षेत्रांत योगदान असतांना त्यांनी एकही लाभाचे पद वा लोकप्रतिनिधीत्व मिळावे यासाठी कधी प्रयत्न केल्याचे आठवत नाही.तसे,अपवादात्मक संधीची वेळ अनेकदा आली.
मात्र, स्थानिक नेतृत्वांनी त्यांना यशस्वीपणे बळ देण्याचे प्रयत्न केले नसल्याची जाणीव त्यांनी कधी जाणवू दिली नसली तरीसुद्धा त्यांच्या सहकाऱ्यांतून तशी खंत अनेकदा व्यक्त होत असते.असो,बहुतांश प्रमाणात सद्यस्थितीत बहुतांश ठिकाणी घराणेशाहीचा वारसा व केवळ आरक्षणातूनच महिलावर्गाला लाभांच्या पदे मिळतात हे कटूसत्य आहे.त्यामुळे घराण्याचा वारसा असला तरी केवळ स्वकर्तत्वावरच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या कल्पनाताई आज सक्षमपणे प्रत्येक क्षेत्रांत यशस्वी होत आहेत हे ही नसे थोडके.
इतिहासातील पाने चाळली तर,मार्च १९०८ मध्ये न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी निदर्शने करुन त्यांनी त्यांचे हक्क मिळविले. त्यांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ सन् १९१० मध्ये कोपनहेगन यैथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत मार्चमध्ये जागतिक महिला दिन म्हणून स्विकारावा असा मांडलेला ठराव बहुमताने मंजूर करण्यात आल्यानंतर हा दिवस साजरा करतांना महिला-पुरुष समानता निर्मितीसाठी त्याचबरोबर,महिलांच्या हक्कासाठी जागरूकता आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.त्यामूळेच या दिवशी प्रत्येक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्तबगार महिलांचा सन्मान केला जातो. आजच्या या मंगलदिनी..कल्पनाताईंसह समस्त महिला भगिनींना एवढेच म्हणेन की,
तुमच्या प्रयत्नांना यश मिळू दे..
यशाची सोनेरी किनार,
तुमच्या प्रयत्नांना मिळू दे..
लक्ष दिव्यांनी उजळू दे..
तुमचा संसार !
कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढूनी नवी झालर..
स्त्री शक्तीचा होऊ दे पून्हा जागर...!!
आजच्या या मंगलदिनी कल्पनाताईंच्या कार्याची माहिती गौरवाने ज्ञात व्हावा यासाठी त्यांच्या समवेत,विशेषतः बहुजन चळवळीत तसेच,सामाजिक व राजकीय कार्यात सहकारी बंधू म्हणून मला प्राप्त माहिती व त्यांच्याकडून अनुभवयास मिळालेल्या बाबींतूनच मी लेखणीतून मांडल्याचे पूनश्च येथे नोंद घेऊन त्यांच्यासह समस्त महिला भगिनींना आजच्या या मंगलदिनी सोबतच,आगामी उज्वल वाटचालीसही मंगलकामना...!!
- लक्ष्मणराव मा.भवरे कामारीकर,..जिल्हा उपाध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न,नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ नांदेड,..माजी प्रदेश प्रतिनिधी,राष्ट्रवादी किसान सभा महाराष्ट्र,