उस्माननगर, माणिक भिसे| येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता. कंधार येथील महीलाशक्ती एकत्रित येऊन स्थानिक पातळीवर चोरट्या मार्गाने चालू आसलेली दारू बंद करण्यासाठी नारीशक्ती एकत्रित येऊन ग्रामपंचायत शिराढोण सरपंच, ग्रामसेवक, पोलीस स्टेशन यांना एलगार मोर्चा काढून निवेदन दिले.
गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री वाढल्याने गावातील अनेक कुटुंबात वाद होतात तर सध्या शाळा बंद असल्याने लहान मुलं घरीच असतात आणि दारुड्यांचे संस्कार लहान मुलांवर पडतात, यामुळे गावातील अनेक लहान शाळकरी मुले सुद्धा दारूच्या व्यसनाधीन झालीत.एकीकडे मागील ५ महिन्यापासून कोरोना लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनता घरात बसून आहे. शासनाकडून ५ किलो मोफत तांदूळ देऊन स्वतःची सुटका करून घेतात. मात्र हाताला काम नसलेल्या गोरगरिबांच्या घरात असलेले पैसेही शिराढोण येथील अवैध दारू विक्रीमुळे मद्यपी गमावत असून, गृहिणी महिला संसार कसा चालवावा या विवंचनेत सापडल्या आहेत.
शिराढोण येथे अवैध दारूचा महापूर सुरु असून, अबालवृद्ध दारूच्या आहारी गेला आहे कुटुंबाचा उदर्निर्वाहा साठी असणारे पैसे दारूत गमावत असल्याने त्यांचे मुलं बाळांची उपासमार होत आहे.शिराढोण येथील महिला मंडळी च्या वतीने उस्माननगर पोलीस स्टेशनला व ग्रामपंचायत ला निवेदन देण्यात आले असून समस्त महिलांनी बुद्धविहार ते ग्रामपंचायत मोर्चा काढला. गावातील महिला अवैध दारूमुळे त्रस्त झाल्या असून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे हा गंभीर प्रश्न या कोरोना लॉकडाऊन काळात परिसरातील ग्रामीण भागातील महिलांना पडला आहे.
