हिंगोली/नांदेड/ यवतमाळ| मागील आठ दिवसापासून हिंगोली लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदी नाल्याना पूर आल्यामुळे शेतीचे आणि नुकतीच पेरणी केलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने या नुकसान भरपाईची माहिती शेतकऱ्यानी तीन दिवसात म्हणजेच ७२ तासाच्या आत पीकविमा कंपनीकडे द्यावी जेणेकरून पीकविमा मिळण्यास शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे.
मान्सूनची सुरवात झाल्यानंतर पावसाने मध्यंतरी दडी मारली होती तब्बल एक महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरवात झाली आहे. यामुळे खरिपाची पेरणी केलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या पीकविमा भरण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहे याकरिता मुदतवाढ सुद्धा मिळाली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकविमा भरावा आणि जबाबदारीने नुकसान झालेल्या भागातून तीन दिवसात म्हणजेच ७२ तासाच्या आत आपल्या नुकसानीची माहिती संबंधित विमा कंपनीकडे करावी.खासदार हेमंत पाटील यांनी सातत्याने शेतकरी हित समोर ठेवून कार्य केले आहे .सातत्याने शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पत्र व्यवहार केला आहे तर तेवढ्यावरच न थांबता मंत्री आणि संबंधित विभागाशी भेटून मागण्या मंजूर करून घेतल्या आहेत.
गतवर्षी अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या की पीकविमा मिळाला नसल्याच्या यामुळे शेतकऱ्यांनी प्राधान्याने नुकसानीची माहिती द्यावी असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे नुकसान झाल्यास त्याची भरपाई विमा कंपनीकडून अटी व शर्तीनुसार होते. नैसर्गीक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. या जोखीमेंअंतर्गत पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा पाणी ओसंडून वाहिल्याने अथवा पुराचे पाणी शेतात शिरून दिर्घकाळ जलमय राहिल्यामुळे विहिर किंवा शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो.
विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती किंवा पुर्वसुचना विमा कंपनीस देणे अत्यावश्यक आहे. पीक विमा धारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरून Crop Insurance (क्रॉप इन्शुरंन्स) हे ॲप डाउनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी शकल्यास तालुका प्रतिनिधी विमा कंपनी किंवा संबधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयास किंवा आपल्या गावातील संबधित कृषि सहाय्यक यांचेकडे ऑफलाईन अर्ज सादर करावेत असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.