शूर आणि स्वाभीमानी राजा महाराणा प्रताप -NNL


ज्यांचे नाव घेतल्यावर स्फूरण चढते, अशा नावांमध्ये एक आहेत महाराणा प्रताप ! अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जीवाचे रान करून मेवाडचे रक्षण करणार्‍या स्वाभिमानी महाराणा प्रतापांची आज ज्येष्' शु.प.3 अर्थात 13 जून या दिवशी जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांनी दाखवलेल्या अफाट शौर्याविषयीची माहिती थोडक्यात करून घेऊया.  

जयपूरचा राणा मानसिंग याने अकबरापासून आपल्या राज्याला धोका पोहोचू नये; म्हणून आपली बहीण देऊन त्याच्याशी सोयरीक केली होती. एकदा तो राजपुतान्यातून दिल्लीस जात असता, वाटेत मुद्दाम आपल्या वैभवाचे प्रदर्शन करण्याकरता कुंभलगडावर असलेल्या राणा प्रताप यांच्या भेटीस गेला. राणा प्रताप यांनी त्याचा यथायोग्य  आदरसत्कार केला; पण त्याच्या पंक्तीत बसून जेवण्यास नकार दिला. मानसिंगाने याचे कारण विचारता राणा प्रताप म्हणाले, ‘‘स्वतःच्या समशेरीच्या बळावर आपल्या राज्याचे रक्षण करण्याऐवजी जे रजपूत आपल्या मुली-बहिणी मोगलांना देऊन त्यांच्यापासून राज्याचे रक्षण करतात, अशा स्वाभिमानशून्य रजपुतांच्या पंक्तीला मी बसत नाही.’’

राणाजींच्या या घणाघाती वक्तव्याने डिवचला गेलेला मानसिंग वाढलेल्या पानावरून तसाच उठला आणि तिथून जाता जाता म्हणाला,‘‘प्रतापसिंह! रणांगणात तुझी मी वाट नाही लावली, तर नावाचा मानसिंग नाही !’’

मानसिंग प्रचंड सैन्य आणि भरीला अकबराचा मुलगा सलीम यालाही घेऊन राणा प्रताप यांच्या पारिपत्याच्या मोहिमेवर निघाला. राणाजींना ही बातमी लागताच त्यांनी अरवली पर्वतावरील वाटेने जाणार्‍या मानसिंगाच्या सैन्यावर छुपे हल्ले करून त्याचे बरेच सैनिक गारद केले. राणा प्रताप यांच्या तलवारीच्या घावाने शहाजादा सलीम 'ार होणार होता; पण वेळीच त्याने हालचाल केल्यामुळे तो वार त्याच्या हत्तीवर बसला. मानसिंग तर राणा प्रताप यांच्या तलवारीच्या धाकाने स्वतःच्या सैन्याच्या पिछाडीला राहिला. राणाजी आपल्या तळपत्या तलवारीने वेढा कापून निसटून जाण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात कुणा शत्रुसैनिकाने राणाजींचा घोडा चेतक याच्या एका पायावर तीर सोडून त्याचा पाय निकामी केला. तशाही स्थितीत तो स्वामिनिष्ठ घोडा चौखूर दौडत पाठीवरच्या धन्याला घेऊन त्या वेढ्याचा भेद करून दूर दूर जाऊ लागला. तेवढ्यात वाटेत एक ओढा लागला. चेतकने उडी घेऊन तो ओढा पार केला आणि ऊर फुटेपर्यंत धावल्यामुळे त्याने त्याच क्षणी प्राण सोडला.

आपला पाठलाग कोण करत आहे, हे पहाण्यासाठी राणा प्रताप यांनी मागे नजर टाकली, तर अकबराला जाऊन मिळालेला आपला धाकटा भाऊ शक्तिसिंह हा त्याच्या बरोबर आलेल्या चार-पाच मोगल सैनिकांना जिवे मारीत होता. राणाजी ते दृश्य पाहून अचंबित झाले. तेवढ्यात त्या पाचही शिपायांचे प्राण घेऊन शक्तिसिंह राणाजींजवळ आला आणि त्यांना आलिंगन देऊन म्हणाला, ‘‘दादा ! तुझ्यासारखे असीम शौर्य आणि कणखर मन यांच्या अभावी मी जरी मोगलांची सरदारकी करीत असलो, तरी तूच माझा आदर्श आहेस. तुझ्यापुढेच काय; पण तुझ्या त्या निष्ठावंत घोड्यापुढेही मी तुच्छ आहे.’’

हल्दीघाटीच्या या युद्धात मुघल सरदार मानसिंगच्या 80,000 सेनेचा सामना महाराणा प्रताप यांनी त्यांच्या 20,000 रजपूत सेनेसह केला. या युद्धात दोन्ही बाजूंकडील मिळून 17 सहस्र लोक मारले गेले. त्यानंतरही अकबराने महाराणा प्रतापवर अनेक आक्रमणे केली; मात्र तो महाराणा प्रतापला पराभूत करू शकला नाही. शेवटचा उपाय म्हणून अकबराने एक पराक्रमी योद्धा जगन्नाथला मो'्या सेनेसह 1584 मध्ये मेवाडवर आक्रमण करण्यास पा'विले; परंतु 2 वर्षे अथक प्रयत्न करूनही तो महाराणा प्रतापला पकडू शकला नाही. मेवाडचा इतिहास लिहिणारा कर्नल टॉण्ड याने राणा प्रताप यांचा गौरव करतांना म्हटले आहे, ‘प्रबळ महत्त्वाकांक्षा, शासन निपुणता आणि अपरिमित साधनसंपत्ति यांच्या जोरावर अकबराने दृढनिश्चयी, धैर्यशाली, उज्ज्वल कीर्तिमान आणि साहसी अशा प्रतापला नमवण्याचा प्रयत्न केला; पण तो निष्फळ ठरला. 

ख्रिस्ताब्द 1568 मध्ये अकबर बादशहाने चितोडवर स्वारी करून राजपूत स्त्री-पुरुषांची मोठी कत्तल केली. चितोड जिंकून तो देहलीला परत गेला. त्या वेळी चितोडने प्रचंड अग्नीदिव्य केले. चितोडमधील सर्व राजपूत स्त्रियांनी जोहार करून आत्मबलीदान केले. त्या वेळी मेवाडचा राजा उदेसिंग हा युद्धात मारला गेला. त्याचा मुलगा महाराणा प्रताप सूडाने पेटला. त्याने अकबराविरुद्ध मेवाडमध्ये धर्मयुद्ध पुकारले. ख्रिस्ताब्द १५७२ मध्ये मेवाड राज्याचा अधिपती म्हणून त्याने स्वतःवर राज्याभिषेक करून घेतला. या कालावधीत अकबराने भारतातील मोठमोठ्या राजसत्ता जिंकून देहलीतील एकछत्री मोगल सत्ता बलवान केली. महाराणा प्रताप हा शिल्लक राहिलेला एकच बलवान शत्रू होता. त्याच्यापासून मोगल सत्तेला असलेला धोका लक्षात घेऊन त्याचा निःपात करून मोगली सत्ता निष्कंटक करण्याचे अकबराने ठरवले.

महाराणा प्रतापवर स्वारी करण्यासाठी अकबराने आपल्या दरबारातील प्रमुख सेनापती राजा मानसिंग याला एक लक्ष घोडेस्वार, नवीन बंदुका, बाण अशी शस्त्रास्त्रे आणि अगणित हत्ती, घोडे, रथ, पायदळ असे सैन्य देऊन पाठवले. या वेळी महाराणा प्रतापजवळ केवळ तीन सहस्र घोडदळाचे कडवे योद्धे होते. विचार करून महाराणा प्रतापने अरवली पर्वतातील हळदी घाट या दुर्गम जागेवर मोर्चेबांधणी केली. मानसिंगाजवळ प्रचंड सैन्य असल्यामुळे त्याने एकाच वेळी चहूबाजूंनी महाराणा प्रतापवर आक्रमण केले. या आक्रमणात महाराणा प्रताप आणि त्याचे सैन्य यांनी लढण्याची शर्थ केली. प्रचंड मोगल सैन्याला त्यांनी नामोहरम करून सोडले.

युद्धाच्या वेळी महाराणा प्रतापसारखा दिसणारा त्याचा विश्‍वासू सरदार बिंदाझाला सर्व युद्ध परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत होता. युद्धाच्या धुमश्‍चक्रीत एका विशिष्ट आयुधाद्वारे महाराणा प्रतापचा शिरच्छेद करण्याची शत्रूसैन्याची कारवाई बिंदाझालाच्या नजरेतून सुटली नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अत्यंत चपळाईने त्याने युद्धधुंद होऊन लढणार्‍या महाराणाच्या मस्तकावरील राजमुकुट स्वतःच्या मस्तकी धारण केला आणि तो शत्रूसैन्यावर तुटून पडला. शत्रूसैन्याने महाराणा प्रताप समजून त्याला ठार मारले. अतिशय थोडे सैन्य आणि युद्धाचा एकंदरीत रागरंग पाहून महाराणा प्रतापने बलीदान स्वीकारण्याऐवजी माघार घेऊन पुन्हा स्वारी करण्याचा निश्‍चय करून आपल्या सैन्यानिशी तो अरवली पर्वतात शत्रूसैन्यादेखत निघून गेला.

या युद्धात महाराणा प्रतापने मोगल सैन्याला इतके जेरीस आणले होते की, मोगलांनी महाराणा प्रतापचा थोडासुद्धा प्रतिकार केला नाही. महाराणा प्रतापला पकडणे मानसिंगला शक्य झाले नाही. तो देहलीस परत गेला. या युद्धानंतर महाराणा प्रतापने पुन्हा सैन्य जमवून युद्धाची सिद्धता केली. नंतर त्याने अकबराशी तीन वेळा युद्ध केले. या तीनही युद्धांत अकबराला महाराणा प्रतापचा पराभव करता आला नाही किंवा त्याला पकडताही आले नाही. महाराणा असून जंगलात रहाण्याची परिस्थिती येऊनही धैर्याने शत्रूशी शेवटपर्यंत झुंज देणार्‍या या शूर महापुरुषाचा ख्रिस्ताब्द १५९७ मध्ये मोठ्या आजारात अंत झाला.

संकलक : कु. प्रियांका लोणे, समन्वयक, हिंदू जनजागृती समिती, संपर्क क्र.: 8208443401

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी