हिमायतनगर| तालुक्यातील पवना शिवारात वाघाने तीन जनावरावर हल्ला केला. या घटनेत दोन जनावरे जागीच मरण पावली असून, एक वासरू गंभीर आहे. ही घटना दि. 1 शनिवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान पवना तांडा ते रजनी रस्त्यावरील पवना शिवारात घडली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील मौजे पवना शिवारामध्ये वाघाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले असून, आखाड्यावर बांधून ठेवलेल्या जनावरावर हल्ला करण्याचे सत्र सुरूच आहे. गेल्या आठवड्यात पवना तांडा लगत बिबट्याने चार वासरांचा फडशा पाडला होता हया घटनेचा विसर पडला नसतांना महाराष्ट्र दिनाच्या रात्रींळंखी एक घटना घडली आहे.
दि. १ शनिवारी शेतकरी अनिल विठ्ठल पुलेवाड हे शेतात गोरे बांधून आखाड्यातील ढेप व इतर साहित्याची जुळवाजुळव करत होते. त्यावेळी शेतात बांधलेल्या जनावरावर बिबट्याने सायंकाळी पावणे आठ वाजेच्या दरम्यान हल्ला केला. बाहेर येवुन कुत्री का? भुंकतात, जनावरे का हंबरतात याचा कानोसा घेतला असता पुर्ण वाढ झालेला बिबट्या त्यांच्या नजरेस पडला, आकांत करताच बिबट्याने धुम ठोकली.
या हल्ल्यात एक वर्ष वयाचे दोन गोरे जागीच ठार झाले आहेत. तर एका कालवडीची पोळी (घसा) कुरतडुन वाघाने रक्त प्याल्याने रक्तस्राव होऊन ती अतिगंभीर आहे. एकाच आठवड्यात घडलेल्या या दोन घटनांमुळे या भागातील शेतकरी पशुपालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करून पशुपालकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.