आचारसंहितेला केराची टोपली दाखून हिमायतनगर शहरात विकासाची कामे सुरु

आचारसंहितेचा भंग आणि निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी 

 सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा जोर वाढला आहे, यावेळी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मते मिळावीत म्हणून ऐन निवडणुकीच्या तोंडावर हदगाव - हिमायतनगर तालुक्याच्या आमदारांनी नारळ हिमायतनगरात १२ कोटीच्या विकास कामाचे नारळ फोडून, उद्घाटन, भूमिपूजन करून, विकास कामाच्या नावाखाली प्रसिद्धी मिळविण्यावर जोर दिला आहे. परंतु तालुक्यातील बहुतांश विकास कामाचे नारळ फोडून अजूनही ती कामे जैसे थेच असून, नव्याने उपलब्ध झालेल्या निधीची कामे आचारसंहितेच्या नियमांना बगल देत
पांढऱ्या कपड्यातील नगरसेवक पदाधीकारी तथा गुत्तेदाराकरवी सुरु आहेत. हा प्रकार आचार संहितेचा भंग असून, याबाबत सबंधितांवर कार्यवाही करावीं अशी मागणी समाजीक कार्यकर्ते सुभाष दारवंडे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी नांदेड व संबंधित विभागाकडे केली आहे. तर विकास कामाचा दिखावा करून मते मिळविण्याची धडपड सत्ताधारी पुढार्यांकडून केली जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात व सामान्य नागरीकाच्या चर्चेतून पुढे येत असून, होत असलेली कामेसुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाची केली जात असल्याच्या तक्रारींचा ढीग संबंधितांकडे येऊन पडल्याचे चित्र सोशियल मीडियावर वायरल झालेल्या प्रतीवरून दिसून येत आहे.

विद्यमान आमदार महोदयांनी तालुक्याचा कारभार सांभाळल्या पासून मागील चार वर्षाच्या काळात एवढे नारळ कधीही फोडले नाही. तेवढे नारळ ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एका दिवसात १० ते १२ ठिकाणचे नारळ फोडून उद्घाटन, शुभारंभ करून कामाला सुरुवात केली आहे. उद्घाटनानंतर लगेच १० मार्च रोजी राज्यभरात आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली. परंतु सदरची कामे  मंजूर करून आणण्यासाठी संबंधित नेत्यांच्या स्वीय सहाय्यकांनी गुत्तेदारी घेतलेल्या संबंधित गुत्तेदाराकडून मोठ्या प्रमाणात टक्केवारी वसूल केली अश्या प्रतिक्रिया नाव न सांगण्याच्या अटीवर काहीने दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर गुत्तेदारांकडून जाहिरातीच्या नावाखाली लाखो रुपये उधळून शासनाच्या निधीतील कामे निकृष्ठ दर्जाची करण्यास एक प्रकारे चालना दिली आहे. या मध्ये अधिक तर राजकीय नेत्यांसमोर लाळघोटपणा करणाऱ्या जवळच्या दलाल कार्यकर्त्यांचा समावेश असून, मंजूर कामातून टक्केवारी काढली जात असल्याने रस्ते विकास कामाची पुरती वाट लागत आहे. परिणामी नुकत्याच झालेल्या कामावर अल्पावधीत भेगा पडलायचे दिसून येत असल्याने कामाच्या दर्जावरून स्पष्ठ होत आहे. एकूणचा होत असलेली कामे अत्यंत निकृष्ट आणि अंदाजपत्रकाच्या केराची टोपली दाखवून तसेच आचारसंहितेचा भंग होऊन केली जात असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.

या संदर्भाने काही नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्ते, पत्रकारांनी देखील जिल्हाधिकारी यांच्यासह नगरविकास मंत्र्यांपर्यंत तक्रारी दिल्यावरून हा सर्व प्रकार उघड झाला आहे. एकूणच १२ कोटीच्या कामामध्ये झालेली दलाली आणि होत असलेल्या निकृष्ठ कारभाराकडे अभियंत्यासह वरिष्ठांचे होत असलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष याचा परिणाम आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर पडून उमेदवारासाठी नुकसानदाई ठरणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचाराने वेग धरला असून, मतदानाला १० दिवस शिल्लक आहेत. तर विधानसभा निवडणुकीला आणखीन ४ ते ५ महिन्याचा कालावधी शिल्लक असून, आत्तापासूनच विधासभेची तयारी विद्यमान आमदार महोदयांनी केल्याचे यावरून दिसत आहे. केवळ उद्घाटने करून कोट्यावधीचा निधी आणल्याचे दाखवून सामान्य जनतेची मने वळून मते लाटण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला कि काय..? असा प्रश्न जागरूक मतदारासह सामान्यांना पडला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निवडून येवो अथवा न येवो आपली आमदारकी मात्र टिकली पाहिजे या विचाराने हा सर्व खटाटोप केला जात असल्याचे आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांमधून केला जात आहे.

मागील २० दिवसापूर्वी शहरात १२ कोटी रुपयाच्या निधीतून विविध वार्डात आरसीसी सिमेंट रस्ता, नाली बांधकाम व मजबुतीकरणाचे कामे केली जात आहेत. यापैकी लकडोबा चौक - नांदेड किनवट रस्ता, वॉर्ड क्रमांक १ मधील बाबुराव चवरे ते मुधोळकर यांच्या घरापर्यंत आणि पुढे, बोरगडी रोड ते राम राठोड यांचे घरापर्यंत यासह शहरातील अनेक प्रभागात रस्ते व नालीचे बांधकाम केले जात आहे. हे सर्व कामे अंत्यंत निकृष्ट आणि नियमांची पायमल्ली करून आणि आचारसंहितेचा भंग करून केली जात आहेत. सदरची कामांना मंजुरी मिळविण्यासाठी काढण्या आलेली निविदा त्याचा दिवशी वाढीव दराने तडकाफडकी मंजूर करून नियमबाह्य पद्धतीने मजूर करून घेण्यात आली आहेत. मंजूर झालेली कामे स्टेट लेव्हल एसएसआर च्या आयटम नुसार अंदाजपत्रक असताना या सर्व नियमन केरात टोपली दाखऊन निकृष्ट कामे केली त्याची उच्चस्तरीय चौकशी करून अधिकारी, पदाधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी आणि आचारसंहितेच्या काळात कामे बंद ठेवण्यात यावी. अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष दारवंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधितांकडे एका निवेदनाद्वारे दि.०३ एप्रिल रोजी केली आहे.

एकूणच शहरात सुरु असलेल्या रस्ता व नाली बांधकामामध्ये विविरीचा मुरुमाड हिरव्या रंगाचा ठिसूळ दगड, कमी ग्रेड असेलेल्या कंपनीचे निकृष्ठ दर्जाचे सिमेंट व माती मिश्रीत रेतीचा वापर केला जात आहे.  एवढेच नव्हे सदर रस्त्याच्या कामाची कुरिंग केली जात नसून, लाखो रुपयाचे काम अर्ध्या किमतीत दोन - तीन दिवसात पूर्णत्वास नेवून मार्च एंडच्या नावाखाली बिल काढण्याचा प्रयत्न अभियांत्याशी  मिलीभगत करून केला जात आहे. सदरची कामे निकृष्ठ होत असल्याची तक्रारी नागरसेवकासह त्या-त्या भागातील अनेक ग्रामस्थांनी देवूनही रस्त्याच्या कामाची चौकशी तर सोडा साधी पाहणी सुद्धा न करता संबंधित विभागाने नगरसेवकाच्या नावाखाली गुत्तेदारी करणाऱ्याला अभय देवून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे अल्पावधीतच रस्त्याच्या कामाची वाट लागून मोठ - मोठे खड्डे पडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच बर्याच ठिकाणी झालेल्या कामावर पुन्हा पुन्हा मंजुरी मिळवून कामे कागदावरच पूर्ण केल्याचे दाखवीत लाखोचा निधी घश्यात घालण्याचा प्रकार अभियंत्यांना हाताशी धरून केल्याचे गुत्तेदार व त्यांच्याच निकट वर्तीयातून बोलले जात आहे. या सर्व प्रकाराकडे निवडणूक आयोग व संबंधित बांधकाम खात्याने लक्ष देवून आचारसंहितेचा भंग करीत सुरु असलेल्या कामाची चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी