वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरावरील टॉवरचे पिल्लर कोसळून चार जण जखमी

वादळी वाऱ्याने शहरातील अनेक दुकानांसह घराचे लाखोंचे नुकसान 

हिमायतनगर (अनिल मादसवार) महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला शहराला अवकाळी वादळाचा मोठा फटका बसला असून, याचा वादळाने वैद्यकीय अधिकाऱ्याच्या बिल्डिंगच्या घरावरील टॉवरचे पिल्लर कोसळून तीन चिमुकले व दोन महिला जखमी झाल्या आहेत. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी त्यांच्या घराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सोमवारच्या सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. या सुवासात वाऱ्यासह शहरात महाशिवरात्रीच्या स्वागतासाठी लावलेले शुभेच्छांचे बैनरचा अक्षरशा चिंधड्या झाल्या. तसेच ग्रामीण भागातील शेतीतील चणा, करडी, सूर्यफूल, गहू, ऊस, ज्वारी आडवी झाली. तर बैलांसाठी जमा केलेले वैरण वाऱ्याने रानोरान पसरली आहेत. आंब्याला आलेला मोहर गळून पडला आहे. तर हिमायतनगर शहरातील बसस्थानक परिसरातील दुकानाचे छत वाऱ्याने उडाल्याने आणि वीज तारा खाली पडल्याने जोगदंड, गंधम यांच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले. याचं वेळी पावसापासून बचाव करण्यासाठी शहरातील परमेश्वर गल्लीतील घरात बसलेल्या परमेश्वर गल्लीतील संतोष गोविंदराव लुम्दे, श्यामराव गंगाराम लुम्दे, राजेश्वर गंगाराम लुम्दे यांच्या तीनहि घरावर बाजूला लागून असलेल्या वैद्यकीय अधिकारी चव्हाण यांच्या चार मजली इमारतीवरील टॉवरचे पिल्लर कोसळून घरावर पडल्याने घरातील कु.संचिता वय २ वर्ष, कु.सानिका वय ७ वर्ष व कु.शीतल वय ७ महिने ह्या जखमी झाल्या. 

तर लक्ष्मिबाई लुम्दे, अनिता लुम्दे या दोघीना टिन पत्राचा मार लागला आहे. या घटनेमुळे घराचे पूर्णतः नुकसान झाले असून, घरातील टीव्ही, कापूस, तूर, ज्वारी, सोयाबीनसह गृहउपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे अखे कुटुंब भयभीत झाले असून, अगोदरच काम नाही आणि आता झालेले हे नुकसान कसे भरून काढावे. या पैशेवाल्यांचे काय पुन्हा घर बांधून घेतील आम्ही गरिबांनी काय करावे.. घरावर पडलेल्या या पिलरमुळे माणसं मारायची वेळ आली असल्याचे सांगून धाय मोकल्याने रडू लागले होते. दरम्यान या घटनेनेमुळे आपद्ग्रस्त शेतकरी व शेतमजूर कुटुंब उघड्यावर पडले आहे. या नुकसानग्रस्तांना शासनाने तातडीने मदत करावी आणि घराचे झालेले नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही कुटुंबांच्या नातेवाईकांनी केली आहे.  

तालुक्यातील मौजे मंगरूळ, सिरंजनी यासह अनेक भागात गारपीट झाली असून, याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून, तालुक्यातील अनेक गावात कमी  -अधिक प्रमाणात पाऊस झाला असल्याचे त्या भागातील नागरीकांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतांना सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी