नांदेड, अनिल मादसवार.... आहिल्यादेवी ह्या उत्तम शासकाचे आदर्श उदाहरण असून ते आजही पारदहशक ठरणारे आहे. मंदिर जिर्णोद्धारासोबतच शैक्षणिक सुविधाचे खुले दालन सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचे काम मोठ्या प्रमाणावर अहिल्यादेवी होळकर यांनी केले आहे असे प्रतिपादन शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी केले.
धनगरवाडी येथे अहिल्यादेवी जयंती साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते याप्रसंगी आमदार हेमंत पाटील, तालुका प्रमुख जयवंत पाटील, व्यंकोबा येडे,व्यंकटराव मोकले, गोविंद सुवर्णकार, के.एम.वड्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना आमदार हेमंत पाटील म्हणाले की, आहिल्यादेवींचा कार्यविस्तार महाराष्ट्रापुरताच नाही तर देशभर आपल्याला पाहायला मिळेल. त्या एक उत्तम शासक होत्या. त्यांच्या कारकिर्दीत हिंदू देवळांच्या व बारा ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्रांच्या जिर्णोद्धार, बद्रीकेश्वरपासून ते रामेश्वरापर्यंत व जगन्नाथपुरी पासून सोमानाथपर्यंत अनेक मंदिरे, उद्याने, विश्रामगृहे, अन्नछत्रे, विहीरी,धर्मशाळा, रस्ते, पाणपोई असे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले. धनगर समाजाला हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी मी येत्या पावसाळी अधिवेशनात या विषयावर सभागृहात चर्चा करणार असल्याचेही यावेळी सांगितले. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रत्येक लढ्यात आपण महादेव जानकर यांच्या सोबत राहू असा ठाम विश्वास देखील आमदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी मारोती काळे, तंटामुक्ती अध्यक्ष मुरलीधर पगडे, बापूराव पगडे, काळबा काळे, गंगाधर काकडे, सोपान काकडे, श्याम काकडे, भुजंग काळे, गंगाधर काकडे, पंढरीनाथ काळे, रामदास काळे, नागोराव काळे, अमोल काळे यांच्यासह मोठया संख्येने गावकरी व महिला उपस्थित होते.