शोर्ट सर्किटमुळे शेतकऱ्याचा १२ क्विंटल कापूस आगीच्या भक्षस्थानी....५० हजाराचे नुकसान
हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील मौजे कोत्तलवाडी येथील एका शेतकरी महिलेच्या घरातील विद्दुत तारात स्पार्किंग होऊन १२ क्विंटल कापूस आगीच्या भक्षस्थानी सापडल्याची घटना दि.२७ च्या दुपारी ३ वाजेच्या दरम्य घडली आहे. या घटनेत जवळपास ५० हजाराचे नुकसान झाले असून, महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील सरसम ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या मौजे कोत्तलवाडी येथील अल्पभूधारक महिला शेतकरीने बाजारात कमी भाव असल्याने शेतात निघालेला कापूस वेचून घरी साठवून ठेवला होता. संक्रांत झाल्यानंतर दर वाढ होताच बाजारात विक्री करीन या आशेत असताना शासनाच्या उदासीन धोरणामुळे अजूनही कापसाचे भाव वाढणे तर सोडा उलट कमीच होत आहेत. या विवंचनेत नित्याप्रमाणे घरातील सर्व कुटुंबीय शेतातील कामासाठी मंगळवारी गेले होते. दरम्यान दुपारच्या ०४ वाजेच्या दरम्यान महावितरण कंपनीच्या विद्दुत पुरवठ्यात नेहमी प्रमाणे होत असलेल्या कमी - अधिक दाबामुळे घरातील वायरिंग मध्ये स्पार्किंग होऊन आगीचा भडका उडाला. अचानक लागलेल्या आगीत घरातील १२ क्विंटल कापूस आगीच्या भक्षस्थानी सापडला. आजूबाजूच्यांना घरातून येणारा धूर दिसल्यानंतर आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत जवळपास सर्वच कापूस जळून गेला. तर खालच्या भागात राहिलेला कापूस काळा पडल्याने याची किंमत कवडीमोल झाली आहे. या घटनेत शेतकरी महिलेचे ५० हजारचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती तलाठी कुलकर्णी यांना दिल्यानंतर त्यांनी दुसर्या दिवशी येउन गावातील सरपंच व नागरिकांच्या उपस्थितीत पंचनामा केला आहे. अगोदरच शेतकरी अल्प पावसामुळे नुकसानीत आलेले असतान आता त्यात अशी घटना घडल्याने शेतकरी पुरता अडचणीत आला आहे. या घटनेमुळे शेतकरी महिलेच्या चिंतेत वाढ झाली असून, आता जगावे कसे या विवंचनेने ग्रासले आहे. या घटनेतून सावरण्यासाठी महावितरण कंपनीने व शासनाने तातडीची मदत द्यावी अशी मागणी नांदेड न्युज लाईव्हच्या माध्यमातून गावकर्यांनी केली आहे.