कायद्याच्या चौकटीत राहून सन- उत्सव साजरे करा - अनिलसिंह गौतम
हिमायतनगर(अनिल मादसवार)कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो कायद्याचा सर्वांनी आदर करायला पाहिजे. कायद्याने चालल्यास नुकसान शुन्य टक्के तर फायदा अधिक असतो. याची जाणीव सर्वांनी समजून घ्यायला हवी, म्हणून आगामी काळात होणार्या गौरी - गणेशोत्सव कायद्याच्या चौकटीत राहून साजरे करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी केले.
ते हिमायतनगर पोलिस स्थानकात आयोजित गणेशोत्सव, दुर्गा उत्सव, दसरा, तथा निवडणुकी संदर्भात आयोजित शांतता कमेटीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, सर्व जाती धर्माच्या लोकांनी सर्व उत्सव आपले समजून एकोप्याने साजरे करावे. कायद्याचे पालन करत मंडळाच्या युवकांनी गणेशोत्सव - दुर्गाउत्सव स्थापना ते विसर्जन पर्यंत सुरक्षेची काळजी घ्यावी. उत्सव काळात बैनर, फलक लावण्यापूर्वी संस्थेची(ग्राम पंचायत) परवानगी घ्यावी, न्यायालयाचे नियम पाळून लोडीस्पिकर, वाद्याचा वापर करावा, वेळेत विसर्जन करावे, शांततेने उत्सव साजरे करावे. उत्सव काळात आमचे पोलिस कर्मचारी गस्तीवर असतीलच त्यामुळे कोणीही कायद्याभंग करण्याचा प्रयत्न करू नये. जो कोणी कायदा विरोधी कृत्य करेल त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. म्हणून मंडळासह सर्वांनी पोलिसांनी दिलेले तोंडी व लेखी आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यासाठी कायद्याचे नियम माहित करून घेऊन पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी तंत मुक्त समितीचे अध्यक्ष अनवर खान, प्रकाश कोमावार, सरदार खान, अनंता देवकते, संजय माने, गजानन चायल, राम सूर्यवंशी, गजानन मांगुळकर, रामदास रामदिनवार, नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, प्रकाश जैन, अशोक अन्गुलवार, कानबा पोपलवार, दत्ता शिराने, दिलीप शिंदे, धम्मा मुनेश्वर, परमेश्वर शिंदे, ज्ञानेश्वर पंदलवाड, पाशा खतीब, संजय मुनेश्वर, वसंत राठोड, यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी, नागरिक, पत्रकार व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
उत्कृष्ठ देखावे करणार्यास बक्षीस
गत अनेक वर्षापासून गणेशोत्सव- दुर्गा उत्सव काळात उत्कृष्ठ देखावे, समाज उपयोगी कार्यक्रम, रक्तदान आदि प्रकारचे कार्यक्रम केल्या जातात. मात्र प्रशासनाकडून मंडळाला केवळ प्रमाणपत्र देऊन बोळवण केली जात असल्याची खंत उपस्थित मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यावर श्री गौतम यांनी गणेश मंडळाची नाराजी लक्षात घेऊन या वर्षी जातीय सलोखा, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रुन हत्या, रक्तदान, पाणी आडवा पाणी जिरवा, दुष्काळी स्थिती यासह अन्य समाज उपयोगी देखावे सदर करतील त्यांना बक्षिसाच्या रुपात वैक्तिक ढाल व अन्य प्रकारचे बक्षीस देण्याचे आश्वासन दिले. तसेच वरिष्ठ जिल्हा स्तरावरून देण्यात येणारे प्रमाणपत्र सुद्धा मिळेल अशी ग्वाही दिली.