माधवराव पांडागळे यांची पुण्यतिथी साजरी; रक्तदान व आरोग्य शिबिर
नांदेड| राज्याचा मुख्यमंत्री किंवा मंत्री म्हणून काम करताना माझे नेहमीच नांदेड जिल्ह्याकडे विशेष लक्ष राहिले आहे. आपल्या जिल्ह्याला व मराठवाड्याला अधिकचा निधी मिळाला पाहिजे. या विभागाचा विकास झाला पाहिजे. याकडे आपले सदैव लक्ष असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव पांडागळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या भव्य रोगनिदान व रक्तदान शिबिरप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केदार जगद्गुरु श्रीश्रीश्री 1008 भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी हे होते. तर व्यासपीठावर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. अमरनाथ राजूरकर, आ. तुषार राठोड, माजी आ. ईश्वरराव भोसीकर, माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, जिल्हा काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ. मीनलताई खतगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संभाजीराव धूळगंडे, जि. प. चे माजी शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे,
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, प्रवक्ते संतोष पांडागळे, माजी जि.प.सदस्य बबनराव बारसे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, संजय भोसीकर, बाळू गोमारे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे, जि. प. चे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे, डीपीडीसीचे माजी सदस्य एकनाथ मोरे, माजी नगराध्यक्ष सुनील शेट्टे, कल्याण सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष शरद पवार, शहाजी नळगे, बाबूराव देशमुख कौठेकर, सरपंच खुशाल पांडागळे, नागोराव मोरे, किशनराव लोंढे, राम सोनसळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले की, माधवराव पांडागळे हे जनतेत राहून काम करणारे नेते होते. त्यांना कंधार पंचायत समितीच्या सभापती पदावर काम करण्याची संधी काँग्रेस पक्षाने दिली. त्यांनी या पदावर असताना लोकांसाठी इतके झोकून देऊन काम केले की त्यामुळे त्यांच्या अखेर श्वासापर्यंत त्यांना जिल्ह्यातील जनता सभापती या नावानेच ओळखत होती. त्यांचा वारसा पुढे बालाजी पांडागळे हे उत्तमपणे चालवतील, असा माझा विश्वास आहे.
मी जेव्हा सत्तेत होतो तेव्हा मराठवाड्यासाठी अधिकचे देण्याचा माझा प्रयत्न असत. त्यातल्यात्यात नांदेड जिल्ह्याला मी नेहमीच झुकते माप दिले आहे आणि देत राहीन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी डीपीडीसी सदस्य एकनाथ मोरे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक बालाजी पांडागळे यांनी केले. उपस्थितांचे आभार व्यंकटराव मालीपाटील यांनी मानले.
अशोकराव चव्हाण सर्वोच्च पदावर राहतील - जगद्गुरु
सत्ता येते जाते पण लोकांमधील नेत्यांचे काम अढळ असते. अडचणीच्या वेळी मनावरला संयम हाच खऱ्या अर्थाने आपल्याला प्रगतीपथावर नेतो. अशोकरावांचे कर्तृत्व आणि नेतृत्व माझ्या नजरेसमोर आहे. एखाद्याने स्तुती करा सांगितले म्हणून मी कोणाची स्तुती करत नाही. माझ्या अंतःकरणातून आलेले भाव नेहमीच सत्यात उतरलेले आहेत. यावरून पुढील 15 वर्षे अशोकराव चव्हाण सर्वोच्च पदावर कायम राहतील, अशा शब्दात श्री केदार जगद्गुरु यांनी यावेळी अशोकराव चव्हाण यांना शब्दरुपी आशीर्वाद दिले.