काय ती चौकशी..काय ती कारवाई अन् त्यासाठीचा मुहूर्त शोधणे सारं काही ओकेच -NNL

बिडीओ वाजे यांचा आर्थिक लोभापोटी जातियद्वेष ; बहुचर्चित मेळगांव सरपंचांच्या तक्रारीची थेट राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री  यांच्याकडून दखल ! 


नांदेड/नायगांव बा.।
बहुचर्चित मेळगांव ग्रामपंचायतीचे तत्कालीन दोषी ग्रामसेवक एन.एस.यरसनवार हे त्यांच्या कार्यकाळातील अभिलेखे व दस्ताऐवज चौकशीसाठी सादर करत नसतांनाही नायगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एल.आर.वाजे यांनी मात्र त्यांचेवर कारवाईऐवजी आर्थिक लोभापोटी आपल्यावर जाणीवपूर्वक जातियद्वेष करित असल्याचे थेट राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारींची दखल घेतली मात्र दुसरीकडे नांदेडच्या जिल्हा परिषदेसह नायगांव पंचायत समितीला अद्यापही यासाठी जणू सवडच नाही त्यामूळे काय ती चौकशी..काय ती कारवाई अन् त्यासाठीचा मुहूर्त शोधणे सारे काही ओकेच ! अशी संतप्त प्रतिक्रिया सरपंच मोहन धसाडे व मेळगांववासियांतून ऐकावयास मिळाली.

प्राप्त माहितीनुसार, ग्रा.पं.मेळगांवचे सरपंच मोहन धसाडे यांच्या ग्रामपंचायतीच्या कोऱ्या चेकबुकवर त्याचबरोबर, त्यांच्यासह तब्बल चार ग्रामपंचायत सदस्यांच्या मासिक व ग्रामसभांच्या कोऱ्या रजिस्टरवर तत्कालीन ग्रामसेवक श्री.एन.एस यरसनवार यांनी स्वाक्षरी घेतल्या होत्या.अनेकदा  विनंतीनंतरही त्यांना विविध सभांचे विषय व माहिती देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ चालविली.योजनानिहाय विकास कामे आपल्या हस्तकांकडून दर्जाहीन व कागदोपत्री पूर्ण करुन घेतांनाच रस्ते,पाणी,विज, आरोग्य,नालीसफाई व गांवची स्वच्छता या स्थानिक जनतेच्या मुलभूत गरजा पूर्ण करणे दूरच करवसुलीसारख्या महत्वपूर्ण बाबींकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

शासनाच्या प्रत्येक योजनांची माहिती देणे दूरच गांवात मुख्यालयी वास्तव्यालाही ते नव्हतेच व आठवड्यातून एक-दोन दिवसही ग्रामपंचायतीला येत नसत. त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यासह योजनानिहाय लाभार्थ्यांची विविध प्रमाणपत्रांसाठी हेळसांड होत होती.एवढेच नव्हे तर,स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीची प्रशासकीय ईमारतच अस्तित्वात नसल्याने एखाद्या योजनेतून ती बांधकाम करण्यासाठीही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.म्हणूनच राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी दि.२६ जून रोजी नायगांवच्या पंचायत समिती कार्यालयासमोर सरपंचासह चार ग्रामपंचायत सदस्यांनी यासाठी आमरण उपोषण सुरु केल्यानंतर तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी माधव केंद्रे यांनी या प्रकरणात चौकशीसाठी द्विसदसीय समिती गठीत केली तसेच,तत्कालिन ग्रामसेवक यरसनवार यांच्या बदलीचे आदेश काढले आणि त्यांच्याजागी ग्रामसेवक वाय.डी.सुर्यवंशी यांना नियुक्त करुन यरसनवार यांना आपल्याकडील ग्रामपंचायतीचा पदभार तात्काळ त्यांना देण्याचे आदेश दिले होते.

परंतू,तरिही संबधित ग्रामसेवक यरसनवार यांनी याबाबत चालढकल केली. त्यातच,पं.स.नायगांवच्या गटविकास अधिकारी या रिक्त पदावर एल.आर.वाजे रुजू झाले.त्यांना अनेकदा विनंती व अर्जव केल्यानंतरही संबधित ग्रामसेवक यरसनवार यांनी आपल्याकडील ग्रामपंचायतीचा पदभार देण्यासाठी येथिल पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी शेख लतिफ यांच्यामार्फत सातत्याने वेळच वाढवून घेतल्याने सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामसेवकाअभावी विविध समस्यांनी त्रस्त स्थानिक जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत होते.त्यामुळेच मग पून्हा एकदा त्यांना लोकशाहीमार्गाने आंदोलनाचा पावित्र्यात यावे लागले अखेर सुर्यवंशी यांना रुजू करून घेण्यात आले व ग्रामपंचायतीचा पूर्णपणे नाही पण तात्पुरता का असेना पदभार दिला असला तरिही तत्कालिन दोषी ग्रामसेवक यरसनवार यांनी द्विसदसीय चौकशी समितीला मात्र चौकशीसाठी आपल्या कार्यकाळातील ग्रामपंचायतीचे अभिलेखे व दस्ताऐवज सादर केलेच नाहीत.

याबाबत चौकशी अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतरही गटविकास अधिकारी वाजे यांनी केवळ कागदोपत्री मेळ जमविण्याचा प्रयत्न करित संबधित तत्कालीन दोषी ग्रामसेवकाची चांगलीच पाठराखण केली सोबतच,सद्या कार्यरत ग्रामसेवक सुर्यवंशी यांच्या बदलीबाबत दि.२६/०७/२०२२ रोजी सुनावणीसाठी तर, दि.१२/०८/२२ रोजी चक्क जावक क्रमांक नसलेले त्यांच्या बदलीचे आदेश काढून आर.पी.नव्हारे नामक ग्रामसेवकाला पदभार देण्याचे अशाप्रकारे तब्बल दोनवेळा नियमबाह्यपणे कृत्य केले एवढेच नव्हे तर,तत्कालिन ग्रामसेवक यरसनवार यांना दिलेल्या कारणे दाखवा नोटीस जावक क्रमांक १८६५ या पत्रावर संगणकीय मुद्रित दि.२६/०८/२०२२ व त्याखाली पेनचा वापर करुन दि.२५/०८/२०२२ अशा प्रकारे संगणकीय मुद्रित पत्र दुसरे दिवशीच्या तारीख मात्र त्याखाली आदल्या दिवशीची तारिख टाकून त्यावर स्वतःची स्वाक्षरी करुन आपल्या मनमानी कारभाराचा नव्हे तर,आपल्या कार्य व कर्तव्यतत्परतेचाच (!) जणू प्रत्यय दिला.

अशाप्रकारे कार्यपद्धती अवलंबित गट विकास अधिकारी निश्चितच या प्रकरणात स्वतःचे आर्थिक हित साधून जातियद्वेषातून आपल्या विरोधात कटकारस्थान  करित असून त्यासाठी त्यांना येथील पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी शेख लतिफ यांचीही नित्याप्रमाणेच साथ असल्याने  संबधित दोषीं तत्कालीन ग्रामसेवक यरसनवार व त्यांची पाठराखण करणार्‍या या संबधित दोघांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी वा यासाठी आपल्या वरिष्ठांसह मा.सक्षम न्यायालयात दाद मागण्यासाठी परवानगी द्यावी याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या दि.६ सप्टेंबरपासून पासून जि.प.नांदेड कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे सरपंच मोहन धसाडे व गंगाधर कंदरवाड,माधव शिंदे, सौ.भारतबाई महिपाळे या  ग्रामपंचायत सदस्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव,जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा,मुख्य कार्यकारी अधिकारी व संबधित वरिष्ठांना तक्रार देत कारवाईचे साकडे घालीत कळविले.

 विशेष बाब म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री ना.शिंदे यांच्यास्तरावरुन राज्याच्या ग्रामविकास विभागाचे सचिव राजेश कुमार यांना तर, उपमुख्यमंत्री ना.फडणवीस यांच्यास्तरावरुन राज्याच्या महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांना सदर प्रकरणात योग्य त्या कार्यवाहीचे निर्देश देण्यात आल्याचा ई-मेल संदेश प्राप्त झाला असून या वरिष्ठांनी आपल्या तक्रारीची दखल घेतली असली तरिही जिल्हा परिषदेसह पंचायत समितीचे प्रशासक तथा,संब॔धित अधिकारी यांना मात्र या प्रकरणात कारवाईला जणू मुहूर्तच शोधावा लागत  आहे त्यामुळेच अद्यापही त्यांच्याकडून आम्हाला कोणत्याच प्रकारचा पत्रव्यवहार मिळाला नसल्याने नांदेड जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर उद्या दि.६ सप्टेंबरपासून आम्ही आमरण उपोषणास बसणारच असून दोषीं व त्यांची पाठराखण  करणारेंविरुद्ध कायदेशीर कारवाई होईपर्यंत आमची माघार नसल्याचे सरपंच धसाडे यांनी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी