नांदेड| नांदेड सारख्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलींना रोजगारांची नवीन संधी उपलब्ध व्हावी, यादृष्टीने नांदेड येथे रोजगार मेळाव्याचे बुधवार 28 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. मुलींचा आत्मविश्वास द्विगुणित व्हावा या उद्देशाने नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या मुलींसाठीच्या या विशेष रोजगार मेळाव्यास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तब्बल 7 हजार मुलींनी आपली नाव नोंदणी केली.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट व कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग नांदेड व समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथील यशवंत महाविद्यालयात हा महामेळावा संपन्न झाला.
नारीशक्तीच्या या अनोख्या उत्सवास खासदार हेमंत पाटील, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देवून सहभागी मुलींना धैर्यासह शुभेच्छा दिल्या. खास मुलींसाठी बैंगलोर स्थित टाटा कंपनीच्या कार्यालयाने यासाठी विशेष पुढाकार घेतला. या कंपनीच्या प्रतिनिधीनी बॅच निहाय नोंदणी झालेल्या मुलीशी संवाद साधत त्यांचा उत्साह द्विगुणित केला. या मेळाव्यात जिल्ह्यातील सुमारे दोन हजार मुलीची निवड झाली आहे.
निवड झालेल्या मुलीसाठी टाटा कंपनीतर्फे 16 हजार रुपयाचे विद्यावेतन, तीन लाख रुपयांचा विमा, जेवण व राहण्याची सुविधा देण्यासह त्यांना 24 तास वैद्यकीय सुविधाही उपलब्ध केली जाणार असल्याचे टाटा कंपनीच्या प्रतिनिधीनी दिली. यासर्व निवड झालेल्या मुलीना बेंगलोर व होसूर याठिकाणीच्या कंपनीसाठी निवडली आहे.