नांदेड| शहरवासीयांना नियमित व मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा तत्काळ करावा, अन्यथा 17 मे पासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने आमरण उपोषण केेले जाईल. असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्ष नांदेड शहर शाखेच्यावतीने मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
मागची दोन वर्ष जिल्ह्यात व राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने नांदेड जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्या विष्णुपुरी, जायकवाडी प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असतांना व यावर्षी विक्रमी तापमान नोंदविले जात असतांना शहरवासीयांना अभुतपूर्व अशा कृत्रीम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
मनपा प्रशासनाने पाणी टंचाईच्या प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, अन्यथा 17 मे पासून आमरण उपोषण व त्यानंतर घेराव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ.के.के.जांबकर, ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, कॉ.रामचंद्र बलगुजरी, कॉ.गणेश संदुपटला, कॉ.गणेश शिंदे, कॉ.शिवाजी शेजुळे, कॉ.गुरु पुट्टा, कॉ.श्रीराम यादगिरी आदींच्या स्वाक्षर्या आहेत.