दुपारच्या मुसळधार पावसामुळे खैरगावचा पूल वाहून किनवट - हिमायतनगर झाला बंद - NNL


हिमायतनगर (अनिल मादसवार)
गेल्या ४ वर्षांपासून किनवट - हिमायतनगर रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या नाकर्तेपणा अधिकच वाढला आहे. यास उंटावर बसून शेळ्या हाकणाऱ्या महामार्गाच्या संबंधित अभियंत्यांचा हलर्जीपणामुळे पुलाची कामे संत गतीने केल्याने वाहधारक व प्रवाश्यांची एकच तारांबळ उडत आहे.
 सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाच्या पुराणे राष्ट्रीय महामार्गावरील वळणाचा पूल वाहून गेल्याने नाल्याकाठची शेती खरडून गेली आहे. जोपर्यंत पाणी ओसरून रस्ता तयार होणार नाही पर्यंत हा मार्ग बंद राहणार आहे. त्यामुळे गावाकडं जाणाऱ्या वाहनधारक व प्रवाश्यांची दयनीय अवस्था झाली असून, परत माघारी फिरून ३५ ते ४०  किलोमीटरच्या लांब पाल्याने घर गाठण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

हिमायतनगर - किनवट राज्य रस्त्याचे काम राही कंस्ट्रक्शनच्या ठेकेदाराकडून सुरु आहे. ठेकेदाराने काम सुरु करताना मोठ्या प्रमाणात साहित्य व मनुष्यबळ लावून सुरुवात केली. परंतु गेल्या दोन वर्षांपासून या कामाला संतगती आली आहे. किनवट - हिमायतनगर तालुक्यातील अनेक ठिकाणी पुलाची कामे धीम्या गतीने केल्याने सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने वळण रस्त्यासह पुल वाहुन गेला आहे. त्यामुळे नांदेड - किनवट - चंद्रपूर जाणारी प्रवाशी वाहतूक पावसाळ्याच्या पहिल्याच पावसात ठप्प झाली आहे. परिणामी नाल्याचे पाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये घुसल्याने मोठ्या प्रमाणात पेरणीसाठी सज्ज असलेली शेती जमिनीसह खरडून गेल्याने शेतकऱ्यांनी पेरणी कशी करावी या विवंचनेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.  

मागील दोन वर्षांपासून पावसाळा सुरु झाल्यांनतर वाहतूक बंद होण्याचे प्रकार वारंवार होत असताना देखील संबंधित ठेकेदाराकडून पुलाची कामे तातडीने पूर्ण करण्यायाबाबतचे कोणतेही नियोजन न करताच खोदकाम करून पुलाचे काम अर्धवट ठेवल्याने वारंवार वाहतूक ठप्प होणे, वाहने फसून बसने असे प्रकार पावसाळ्यात प्रवाशी व वाहनधारकांनी अनुभवले आहे. या त्रासाने हैराण झालेले नागरिक किनवट -हिमायतनगर येथील लोकप्रतिनिधींच्या नावाने शिमगा करून हि पुलाची कामे पूर्ण करावी अशी संतापजनक प्रतिक्रिया दिल्यानंतरही कुंभकर्णी झोपेतील राजकीय नेते जागृत होऊन रस्त्याच्या कामामामुळे प्रवाश्यांची होणारी दैना थांबविण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे यंदाच्या पहिल्याच पावसात झालेल्या मुसळधार पावसाने रास्ता बंद झाला आहे. त्यामुळे प्रवाश्याना माघारी फिरून ३० ते ३५ किमीच्या लांब पाल्याचा मार्गाने घर गाठावे लागले आहे.

खरे पाहता सदर महामार्गाचे काम करते वेळेस गुत्तेदाराने प्रथम पुलांचे बांधकाम पुर्ण करूनच रस्त्यांचे काम सुरु करणे क्रमप्राप्त होते. परंतु रस्त्याचे काम करून गुत्तेदारांनी पावसाळ्यात पुलाचे काम सुरु करून प्रवाशांना एक प्रकारे वेठीस धरले आहे. त्यामुळे पावसाळ्यात वेळोवेळी राष्ट्रीय महामार्ग बंद पडत असल्याने नागरिक वैतागले आहेत. आजघडीला इस्लापूर ते किनवट रस्त्याचे काम झाले असून, केवळ पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने अल्पश्या पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय होत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना आणि अतिजलद कामानिमित्त नांदेड ये - जा करणाऱ्या प्रवाशांना वाहनाला लागलेला चिखल काढण्यात तासनतास घालावे लागत असल्याने ठेकेदारांच्या नाकर्तेपणाबाबत वाहनधारक व परिसरातील शेतकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. एवढेच नव्हे तर पूलाच्या कामावर देखरेख ठेवणाऱ्या संबधित राष्ट्रीय महामार्ग अभियंत्याने उंटावर बसून शेळ्या न राखता कामाच्या स्पॉटवर हजर राहुन या महामार्गावरील खोदून ठेवलेल्या पुलाचे काम तातडीने पूर्ण करून पावसाळ्यात  प्रवाश्यांची होणारी दैना थांबवावी आणि पूल वाहून जाऊन शेतकऱ्यांचे झालेले नुकसान बाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ठेकेदाराकडून भरपाई मिळून दिलासा द्यावा अशी मागणी येथील माजी सरपंच राजेश जाधव, प्रवाशी, वाहनधारक व परिसरातील शेतकऱ्यातून केली जात आहे.

नुकसान भरपाई साठी उद्या निवेदन देणार - राजेश जाधव 

पहिलीच पावसात खैरगाव येथील अर्धवट पुलामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचा सामना वाहनधारक, प्रवाश्याना व या भागातील शेतकऱ्यांना करावा लागला आहे. पावसाळा सुरु झाल्यापासून पहिल्याच पावसात हि अवस्था झाली तर पुढील पावसाळ्याचे दिवस कसे काढायचे. गतवर्षी अशीच अवस्था होऊन  १० ते ५ वेळा पूल वाहून गेला होता. त्यामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले, मात्र ठेकेदाराने शेतकऱ्याच्या नुकसानीबाबत तथा चिखलमय रस्त्याने होणाऱ्या त्रासाबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या नव्हत्या. जर पुलाचे काम अगोदर करून रस्ता केला असता तर आज हि परिस्थिती उदभवली नसती. यंदा पुढील पावसाळ्याच्या दिवसात तरी सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्याकडे ठेकेदारने लक्ष द्यावे अशी मागणी खैरगावचे माजी सरपंच राजेश जाधव यांनी केली आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी