आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या पुनर्वसनाची जबाबदारी समाजाचीही - देवेंद्र फडणवीस
पुणे(प्रतिनिधी)आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबीय व त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी जे जे करता येईल ते ते शासन करीत आहेच, मात्र ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजानेही त्यांना आधार देण्यासाठी पुढे यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) वाघोली येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पांतर्गत शैक्षणिक संस्थेमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील 700 मुले-मुली व मेळघाट व ठाणे परिसरातील 300 आदिवासी मुलांचा प्रवेशानिमित्त स्वागत कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट,सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार सर्वश्री अजय संचेती, शिवाजीराव आढळराव- पाटील,अनिल शिरोळे, आमदार सर्वश्री बाबुराव पाचर्णे, जगदीश मुळीक, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस,भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथ्था आदी यावेळी उपस्थित होते. एकीकडे पाश्चात्य समाजामध्ये ‘सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट’ असा विचार आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आपल्या समाजात मात्र ‘वसुधैव कुटुंबकम्’अशी सर्वसमावेशक भूमिका पूर्वीपासूनच आहे. जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती जगेल आणि त्याची जगण्याची व्यवस्था समाज करेल अशा प्रकारच्या मानसिकतेतून आपल्या संस्कृतीचा विकास झालेला आहे. या भावनेतून पुढे आल्यास समाज किती भक्कमपणे काम करु शकतो हे समोर येते.
गेल्या दोन-तीन वर्षात राज्यात झालेल्या अल्प पावसामुळे खूपच गंभीर परिस्थिती उद्भवली. राज्य शासन जलयुक्त शिवार अभियान तसेच अन्य योजनांच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्यासाठी सर्व ते प्रयत्न करीत आहे. मात्र, आपत्तीचं स्वरुपच मोठे असल्यास समाजानेही शासनाच्या हातात हात घालून काम केल्यास आपत्तीग्रस्तांना दिलासा मिळून त्यांना जगण्याची नवी उमेद मिळू शकेल. विदर्भात शेतकरी मोठ्या नैराश्यात असताना यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी कुटुंबियांसाठी ‘बळीराजा चेतना अभियान’ राबविले होते. त्याचा परिणाम म्हणून गेल्यावर्षीपेक्षा 50 टक्क्यांहून आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र सर्वत्रच आत्महत्या कमी व बंद कशा होतील यादृष्टीने शासनाच काम राहणार आहे. लहरी पावसावर अवलंबून राहणारी शेती हे केवळ आसमानी नाही तर सुलतानीही संकट आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा देऊ शकलो नाही; त्यामुळे ते नैराश्यात गेले. मात्र गेल्या दीड- दोन वर्षापासून राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे खेडोपाडी विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण झाले आहेत. त्यांचा उपयोग करुन शेतकरी आपल्या बळावर स्वत:च्या संसाराचा गाडा हिमतीने हाकू शकतो. जलयुक्त शिवार योजनेचे यश शेतकरी, समाजाच्या लक्षात आल्याने ही केवळ शासनाची योजना न राहता लोकचळवळ झाली आणि चांगले काम होत आहे.
आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या व त्यातील मुलांच्या पुनर्वसनासाठी शासन प्रयत्न करत आहेच. मात्र भारतीय जैन संघटना व अशाच संघटना करीत असलेल्या प्रयत्नांमुळे या मुलांना मोठे बळ मिळणार आहे. या मुलांनी मोठे ध्येय ठेवले पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून मोठे व्हावे. त्यातून आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळच येणार नाही अशा प्रकारचे मोठे कार्य करुन दाखवण्याची जिद्द बाळगा,असा संदेशही फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांना दिला. पालकत्व गमावलेल्या मुलांची जबाबदारी स्वीकारणे हे समाजाचे कर्तव्य ठरते. शांतीलाल मुथ्था यांनी समाजाची भूमिका स्वीकारुन या मुलांची, कुटुंबाची जबाबदारी एक पित्याच्या रुपात स्वीकारली, हे त्यांचे मोठे कार्य आहे, असे कौतुकोद्गारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, शिक्षणासाठी राज्य शासन मोठ्या प्रमाणात काम करत आहे. विद्यार्थी फी सवलत, हजारो विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी पाठविण्याची योजना असो किंवा सर्व मागासवर्गीय समाजघटकांतील मुलांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ अशा प्रकारे सर्वच घटकात शिक्षण पोहोचावे म्हणून शासन प्रयत्न करीत आहे. श्री. मुथ्था यांनी केलेले कार्यही भरीव आहे. किल्लारी भूकंपग्रस्तांसाठी शाळा,आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांचे पुनर्वसन, गुजरात भूकंपावेळी तेथे जाऊन शेकडो शाळांचे बांधकाम,त्सुनामी आलेल्या तामिळनाडू आदी भागात जाऊन तेथील शाळांचे बांधकाम असे त्यांचे काम समाजासाठी एक आदर्श आहे, असेही ते म्हणाले.
अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या की, बीजेएस ने प्रत्यक्ष कृतीतून आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आधार दिला. येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शेतीचेही ज्ञान देण्यात यावे; जेणेकरुन शेतीबद्दल नकारात्मक भावना त्यांच्या मनात निर्माण होणार नाही, अशी सूचनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.शांतीलाल मुथ्था यांनी प्रास्ताविकात बीजेएस विषयी माहिती देताना सांगितले की, संस्थेतील कर्मचाऱ्यांनी राज्यातील 26 जिल्ह्यात सर्वेक्षण करुन चालू शैक्षणिक वर्षात 900 हून अधिक मुलांना शाळेत दाखल करुन घेतले आहे. अजूनही 1 जुलैपर्यंत 100 पेक्षा जास्त मुलांचे प्रवेश होतील. संस्थेत आदिवासी भागातील, नक्षलग्रस्त भागातील, जम्मू काश्मिर भूकंपग्रस्त, जबलपूर भूकंपग्रस्त मुलांचेही शिक्षण झाले आहे.
आत्महत्येसाठी मुख्यमंत्र्यांकडे परवानगी मागणारी बीड जिल्ह्यातील महिला अनिता देवकुळे व त्यांच्या तीन मुली नम्रता, सिमरन आणि सोनाली यांचे पालकत्व बीजेएस ने स्वीकारल्याचे जाहीर करण्यात आले. श्रीमती देवकुळे यांना सेवक म्हणून संस्थेत नोकरी देण्यात आली. सर्व एक हजार मुलांचे शिक्षणासाठी प्रवेश प्रतिकात्मक स्वरुपात श्रीमती देवकुळे यांच्या तीनही मुलींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रवेश देऊन करण्यात आले. 90 टक्क्याहून अधिक गुण मिळालेल्या नयन जगदाळे, वैष्णवी कारंजे आणि आदिवासी समाजातील उमेश भंडारे; तसेच चित्रपटात मुख्य भूमिका मिळालेला विद्यार्थी साईनाथ मोदनकर आणि सहायकाची भूमिका मिळालेला सौरभ कदम यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. अमृता फडणवीस यांनी विविध चित्रपटात कामासाठी मिळालेल्या मानधनाची रक्कम वंचित मुलांच्या शिक्षणासाठी यावेळी संस्थेला सूपूर्द केली.यावेळी खासदार अजय संचेती आणि आढळराव- पाटील यांचेही भाषण झाले. वाघोलीच्या सरपंच संजीवनी वाघमारे, बीजेएसचे पदाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक व विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.