हरिणाच्या पाडसाला जीवदान

विहिरीत पडलेल्या हरिणाच्या पाडसाला शेतकरी वन कर्मचार्यांनी दिले जीवदान


नांदेड (अनिल मादसवार) हिमायतनगर तालुक्यातील मौजे टेंभी रस्त्यावरील एका शेतकऱ्याच्या ५० फुट विहिरीत पाण्याच्या शोधत आलेल्या हरिणाच्या कळपातील पाडस पडले होते. रात्रभर विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाला सकाळी शेतकरी व वन कर्मचार्यांनी बाहेर काढून जीवदान दिल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. 

सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून, उष्णतेने ४५ अंश सेल्सियासाचा आकडा पार केला आहे. त्यामुळे विहिरी, बोअरची पाणी पातळी जमिनीला टेकली असून, नदी, तलाव कोरडेठाक पडले आहे. वाढत्या उन्हामुळे जंगलातील झाडांची पानगळी झाल्याने सावलीचा आधार राहिला नाही. तर पाणवठे आटल्यामुळे नीळ, हरीण, मोर, लांडोर, रोही, ससे, लांडगे, रानडुक्कर, वानरे, बिबट्या वाघ आदीसह अन्य वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. 

असेच दि.२६ मंगळवारच्या सायंकाळी पाण्याच्या शोधत टेंभी - नांदेड- किनवट राज्य रस्त्यावरील शेतीतील विहिरीकडे आले होते. दरम्यान अचानक सुसाट वारे सुरु झाल्याने हरणाचे कळप धावू लागले. त्यापैकी हरणाची अंदाजे १.५ महिन्याचे नर जातीचे एक पाडस थेट ५० फुट खोल असलेल्या आशिष सकवान यांच्या गट न.३५ मधील विहिरीत पडले असावे अशी माहिती शेतमजुराने वनकर्मचारी यांना दिली. सकाळी ६ वाजता शेतात फेरफटका मारताना विहिरीतून आवाज आल्याने पहिले असता हरिणाचे पाडस पडल्याचे शेमाजूर इंदल यांना दिसून आले. तत्काळ याची माहिती वनपाल शिंदे यांना दिल्यानंतर वनरक्षक संदीप गुट्टे, वनमजूर अहेमद यांनी भेट देवून पाहणी केली. आणि हरिश्चंद्र राठोड नामक युवकाच्या सहाय्याने विहिरीतून सदर पाडसास बाहेर काढले. 

५० फुट खोल विहिरीत पडल्यानंतर रात्रभर विहरीतील पाण्यात राहिलेल्या हरिणाच्या पाडसाच्या मानेला, डोक्याला, पायाला गंभीर मार लागला असून, त्याच्यावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करून जंगलात सोडणार असल्याचे वनकर्मचार्यांनी सांगितले. यावेळी जगदीश सूर्यवंशी, ज्योतिबा सूर्यवंशी, रमेश जाधव, पत्रकार अनिल मादसवार, कानबा पोपलवार, साईनाथ धोबे यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. 

वनपरिक्षेत्र अधिकार्याचा नाकर्तेपणा 
------------------------ 
पाणी टंचाईमुळे तालुक्यातील अनेक ग्रामीण परिसरात सध्या बिबट्याने धुमाकूळ माजवून अनेक गाई, म्हशी फस्त केल्या आहेत. असे असताना देखील वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम पांडे हे वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी पाणवठे उभारण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत. तर मलिदा लाटण्यासाठी उपयुक्त असलेली बांधकामे करण्यावर भर देत असल्याचा आरोप शेतकरी व परिसरातील नागरीकातून केले जात आहे. तसेच आजवर घडलेल्या एकही घटनास्थळी ते स्वतः हजार राहत नाहीत. वन कर्मचाऱ्यावर सोपवून आपली जबाबदारी झटकत असल्याने वन्य प्रण्याबाबत त्यांना आस्था नाही काय..? असा सवालही वन्य प्रेमी नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

वनविभागाचे अधिकारी उठले जंगलच्या मुळावर 
--------------------------------- 
तालुक्यात असलेल्या जंगलातून सध्या मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड केली जात आहे. यामुळे जंगल नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जंगलात आसरा नसल्याने वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. गेल्या दोन महिन्यात अनेक वन्य प्राण्यांनी मानवी वस्तीकडे धाव घेवून पिण्याच्या पाण्याची शोध शोध चालू केली आहे. लाकूड तस्करांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे भय नसल्याने लाकडांनी भरलेले टेम्पो जंगलातून राजरोसपणे वाहतूक करताना आढळून येत आहेत. या बाबत अधिकार्यांना विचारणा करण्यासाठी संपर्क केला असता मी सध्या बाहेरगावी आहे असे सांगून वेळ मारून नेली. यामुळे वन्यप्रेमी नागरीकातून वनविभागाच्या वेळकाढू वृत्ती बाबत संताप व्यक्त करून जंगल वाचवायचे असेल आणि वन्य प्राणी जोपासायचे असतील तर निष्क्रिय अधिकार्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी