बोगस बदली प्रकरणात हिमायतनगरच्या तिघांचा समावेश..
आणखी १० हून अधिक मासे रडारवर
हिमायतनगर(अनिल मादसवार)गत २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात नियमबाह्य पद्धतीने सोयीचे ठिकाण बदली करून घेणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील १७ शिक्षकांवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिमन्यु काळे यांनी निलंबनाची कार्यवाही केली आहे. त्यात हिमायतनगर तालुक्यातील २ शिक्षक व एका केंद्रप्रमुखाचा समावेश असून, अजूनही १० पेक्षा जास्त शिक्षकांची याचा काळात बदल्या झाल्या होत्या. त्यांच्यावरही कार्यवाहीची टांगती तलवार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
तत्कालीन काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे अध्यक्षांनी काही संबंधित कर्मचर्यांना हाताशी धरून अनेकांच्या नियमबाह्य पद्धतीने बदल्या करून एक पराक्रमाच केला होता. परंतु सत्य हे सत्यच असते ते कधीही लपत नसते. याचा प्रत्यय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिमन्यु काळे यांनी सुरु केलेल्या बदलीच्या चौकशीच्या कार्यवाहीवरून दिसून येत आहे. जी.प.अध्यक्षांना आपल्या स्तरावर केवळ २० शिक्षकांच्या बदल्या करण्याचा अधिकार असताना त्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून ५० ते ६० शिक्षकांच्या नियमबाह्य पद्धतीने बदल्या करून स्वार्थ साधला अशी ओरडा त्या वेळी अनेकांनी केली होती. यात लाखो रुपयाची उलाढाल झाल्याचे सर्वश्रुत असताना त्यावेळी संबंधित अधिकार्यांनी योग्य पुरावा हाती नसल्यामुळे याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु नव्याने जिल्हा परिषदेचा कारभार पाहणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी हळू हळू आपली कामाची चुणूक दाखवीत कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कामाची चौकशी केली. यात नियमबाह्य पद्धतीने बदल्या केल्याचे निदर्शान आलेल्या संबंधित केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यावर कार्यवाहीचा बडगा उगारला आहे. त्यांच्या या धडाकेबाज कार्यवाहीमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, सेवा जेष्ठतेनुसार अन्याय झालेल्या शिक्षकात समाधानचे वातावरण आहे.
नियमबाह्य बदल्यांचे राजकारण हिमायतनगर तालुक्यातील स्वार्थी पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या लालचेने मोठ्या प्रमाणे फोफावले असून, यात अनेक शिक्षक अडकल्याचे बोलले जात आहे. हि बाब सर्वश्रुत असताना देखील कोणीही आवाज उठविल्या नसल्याने संबंधित शिक्षकांनी नेमून दिलेल्या शाळेच्या ठिकाणी कर्तव्यावर हजर न राहत सोयीचे ठिकाण घेवून आपली चांदी करून घेतली आहे. आता ते शिक्षकही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या रडारवर असल्याने त्यापैकी किती जणांवर निलंबनाची कार्यवाही होणार असा सवाल पुढे येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री काळे यांनी पहिल्या टप्प्यात केवळ १७ जणांवर कार्यवाही झाली असली तरी अन्य लोकांवर केंव्हा कार्यवाही होणार याकडे शिक्षणप्रेमी नागरिकांचे लक्ष लागले आहे. कर्तव्यदक्ष अधिकार्यामुळे नियमाप्रमाणे पात्र असलेल्या शिक्षकांना आता न्याय मिळण्याची आशा वाढीस लागली आहे.