हिंगोलीचा खासदार कोण..? चर्चेला उधान...
सट्टेबाजीच्या या व्यवहारात लाखोची उलाढाल..
हिमायतनगर(अनिल मादसवार)हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान दि.१७ एप्रिल रोजीच्या दुसऱ्या टप्प्यात पार पडले असून, ११ तालुक्यांमधील १५ लाख ८६ हजार ४६५ मतदारांनी या निवडणुकीमध्ये मतदान करुन आखाड्यातील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद केले आहे. निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या २३ उमेवारापैकी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार एड. राजीव सातव व शिवसेना, भाजप, रिपाई आठवले गट महायुतीचे उमेदवार खा. सुभाष वानखेडे या दोघांमध्ये अटीतटीची लढत झाली आहे. ऐन प्रचाराच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी कॉंगेसच्या माजी खा.सूर्यकांताताई पाटील यांनी उघडपणे काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार दिल्यामुळे पुन्हा एकदा हिंगोलीचे खा. म्हणून सुभाष वानखेडे हेच " लक्की मैन " ठरणार... कि शेवटच्या टप्यात झालेल्या राहुल गांधी यांच्या प्रचार सभेमुळे राजीव सातव निवडून येणार..अशी चर्चा ग्रामीण भागातील चौक चौकात व चावडीवर रंगली आहे. चर्चेच्या गुऱ्हाळ्यात या वक्तव्याला विरोध करणाऱ्यांमध्ये चक्क हिंगोलीचा खासदार कोण..? यावर पैजा लावण्यास सुरुवात केल्याने सट्टेबाजीच्या या व्यवहारात लाखोची उलाढाल होणार हे मात्र खरे आहे.
उमेदवारी मिळाल्यानंतर खा. वानखेडे यांना पक्षातील अनेक दिगज्जानी विरोध करून बंड पुकाला होता. मात्र विधानसभा क्षेत्रात सर्वच भागात यंदा नमो ची हवा असल्याने व सुभाष वानखेडे यांनी मोठ्या चतुराईने अंतर्गत बंडाळीला हाताळून सर्वाना आपलेसे करून घेतले होते. एवढेच नव्हे तर प्रतिस्पर्धी उमेदवारास निवडणुकीत कश्या पद्धतीने मात करता येईल यात बुद्धिबळाचा उपयोग करून विरोधी पक्षातील नाराज दिग्गज नेते व कार्यकर्त्यांना जवळ करून छुप्या पद्धतीने पाठींबा मिळविला याचे चित्र काँग्रेस वाल्यांसह राजकीय क्षेत्रात रस ठेवणाऱ्या अनेक मतदार व कार्यकर्त्यांनी पाहिलेले आहे. तर काँग्रेस चे उमेवार राजीव सताव यांनी सुद्धा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रचाराची आखणी केली होती. हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या सर्वच विधानसभा मतदार संघात त्यांचीच चालती असल्याचे दिसत होते. खास करून किनवट व हदगाव - हिमायतनगर मतदार संघातील दोन्ही आमदार महोदयांनी जीवाचे रान करून राजीव सातव यांना निवडून आणण्यासाठी अथक परिश्रमही घेतले. परंतु निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात " मराठा हि जात फैक्टर "(जाती पातीचे राजकारण) झाल्याने बहुतांश मते हि सुभाष वानखेडे यांच्या पारड्यात जाऊन पडल्याचे बोलले जात आहे. एवढेचे नव्हे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा वानखेडे यांच्यासाठी अंग झटकून काम केल्याने १६ मे च्या निकालात पुन्हा एकदा खा.सुभाष वानखेडे हेच लक्की मैन ठरतील असा अंदाज वर्तविला जात आहे. तर माळी आणि मुस्लिम बांधवांचे एक गठ्ठा मतदान व ओ.बी.सी.फैक्टर चे मतदान राजीव सातव यांना गेल्यामुळे शिवसनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लाऊन, काँग्रेस उमेदवार निवडून येईल अश्या प्रतिकिया काँग्रेस प्रनितांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहेत.
घड्याळाची मते " हाताला कि बाणाला "
मागील अनेक वर्षापासून हिंगोली लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. परंतु २०१४ च्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेस च्या काही दिग्गजांनी राष्ट्रवादीच्या हक्काची जागा हिरावून घेतली. याचा राग मनात धरलेल्या हिंगोलीच्या माजी खा. सुर्यकांताताई पाटील व खा. शिवाजी माने यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसचे उमेदवार राजीव सातव यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. म्हणूनच राष्ट्रवादी पक्षाचे काही समर्थक सोडल्यास त्यांच्या कट्टर समर्थक कार्यकर्त्यांनी शेवटच्या क्षणी प्रचारानंतर म्हणजे पोलचीट वाटण्यापासून जीव ओतून सेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांचे काम केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या घड्याळाची मते " हाताला कि बाणाला " या चर्चेला उधान आले असून, त्यांची मते ज्या उमेदवाराला मिळाली तोच उमेदवार निवडून येईल अशी चर्चा होताना दिसून येत आहे.
सुभाष वानखेडेंचाच विजय निश्चित...?
कोणत्या गावात किती मतदान झाले...कोणत्या भागात धनुष्य बाण जोरात चालले.. याची सविस्तर चर्चा त्या त्या गावातील कार्यकर्ते करीत आहेत. नांदेड मध्ये काहीही होवो पण हिंगोली मध्ये नामोच्या वादळामुळे सुभाष वानखेडे निवडून आले पाहिजे अशी जनभावना ग्रामीण भागात दिसते आहे. मतदान कसे झाले कोणत्या गावात काय परिस्थिती याचा आढावा वानखेडे समर्थक घेत असून, आकडेवारीच्या मेळ घालीत नक्किच सुभाष वानखेडेंचाच विजय निश्चित असल्याचे सांगत आहेत.
राजीव सातव निवडून येणार ..?
तर राजीव सातव निवडून कसे येतात याचा दावा काँग्रेस व त्यांचे समर्थक कायकर्ते करीत आहेत. आमच्या भागात एक गठ्ठा मतदान हे काँग्रेसच्या हातालाच झाले त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राजीव सातव यांचाच विजय निशित असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. असे दावे करताना दोन्ही गात एकत्रित आले कि, चर्चेवरून एकमेकात बाचाबाची होत असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसत आहे. मात्र तिऱ्हाईत व्यक्तीमुळे या चर्चेला त्याचा ठिकाणावर पूर्ण विराम देवून आगामी १६ मे २०१४ लाच यावर चर्चा करू असे बोलून भांडण मिटविले जात आहेत.
एकुनच काँग्रेस अघाडीचे राजीव सातव आणि शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांच्यात झालेल्या हिंगोली लोकसभा २०१४ च्या निवडणुकीत झालेल्या तुल्यबळ लढतीमध्ये चांगलीच रंगत आली होती. शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसून आले आहे.