अतिवृष्टीग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या -NNL

खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी


नांदेड|
जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेले आहेत.  पुरामुळे पिके वाहत गेले असून जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत अतिवृष्टीग्रस्त भागातील पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे .

नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात जोरदार पाऊस झाल्याने नदी नाल्याचे पाणी अनेक भागात शिरले. नदीकाठची शेती खरडून गेली तर हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आहेत. नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात अतिवृष्टीचा फटका बसला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अत्यंत कष्टाने खरीपाच्या पेरण्या केलेल्या शेतकऱ्याच्या सुखाची स्वप्न अतिवृष्टीने हिरावली आहेत . अशा परिस्थिती शेतकर्‍यांची मानसिक परिस्थिती खालावली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही .त्यामुळे शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी आणि या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी राज्य सरकारने नुकसान ग्रस्त भागातील पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात तातडीची आर्थिक मदत जमा करावी अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे .

दरम्यान सन 2018 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये कंधार - लोहा विधानसभा मतदार संघातिला उस्माननगर आणि बारूळ मंडळात ढगफुटी झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तत्कालीन आमदार म्हणून आपण तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्याच्या अनुषंगाने विनंती केली होती. शेतकरी हिताचे निर्णय त्वरीत घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकार्यसाठी 43 कोटी 65 लाख 85 हजार 20 रुयांचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार मिळाला आणि नैसर्गिक संकटातून शेतकरी सावरू शकला. 

कोवीडमुळे अगोदरच शेतकरी, शेतमजूर संकाटात सापडला असून आता अतिवृष्टीने गाठले आहे. अशा दुहेरी संकटातून बाहेर पडण्यासाठी मदतीची गरज आहे. आता त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे तात्काळ करून त्याचा अहवाल देण्याच्या बाबतीत संबधित यंत्रणेला आदेशित करावेत आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावीअशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी