पावसाचा हाहाकार.. हिमायतनगर तालुक्यातील शेती व घरात पाणी घुसल्याने प्रचंड नुकसान
नांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग बंद; २०१३,16 नंतर नदी - नाले - ओढे ओव्हर फ्लो
आपत्ती व्यवस्थापन पथक नावालाच.... पावसामुळे जनजीवन विस्कळीत...
हिमायतनगर, अनिल मादसवार| मागील पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर दि.२० तारखेपासून शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, पावसाने हाहाकार माजविल्याने सर्वच नाले खळाळून वाहू लागले. तर अनेकांच्या शेती व घरात पाणी घुसल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाचा जोर अधिक असल्याने नांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्गावरील पुलावरून आणि विदर्भ - मराठवाड्यच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद झाली आहे. दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी, पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले हे मात्र खरे आहे. पुराची स्तिती उद्भवली असताना देखील हदगाव रोडवर केवळ उपविभागीय अधिकारी सोडले तर महसुलचे एकही कर्मचारी शहर परिसरात उपस्थित झाले नसल्याने आपत्ती व्यवस्थापन पथक नावालाच आहे कि काय..? असा संतप्त सवाल पुराचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसह नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सन २०१३, २०१६ नंतर हिमायतनगर तालुक्याला मुसळधार पावसाने एवढ्या मोठ्या प्रमाणात झोडपले आहे. तब्बल तिसऱ्या दिवशीही सुरु असलेल्या दमदार पावसामुळे आष्टी, जवळगाव, कामारवाडी, पारवा, कांडली, पोटा, सोनारी, टेभी, सवना ज, महादापूर, सरसम बु, भागात रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे या भागातील शेती व परिसर जलमय झाले होते. पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग काढलेला नसल्याने पुराच्या पाण्याचे अनेकांच्या शेतजमिनी चिरून मार्ग काढला आहे. त्यातच हदगाव - हिमायतनगर रस्त्यावरील जवळगाव ते कामारवाडी मध्ये असलेल्या पुलाची कामे अर्धवट झालेली असल्याने येथून करण्यात आलेला पर्यायी रस्ता वाहून गेला. त्यामुळे पुलावरून आणि शेतीमधून पाणी थेट रस्त्यावर आल्याने गावात पाणी शिरले होते.

तसेच हिमायतनगर - किनवट मध्ये असलेल्या खैरगाव पुलाचा रस्ता वाहून गेल्याने या भागातील शेतजमिनी खरडून पुराच्या पाण्याने नेल्याने शेतीपिके उध्वस्त झाली आहेत. तसेच पाणी ओव्हर फ्लो होऊन वाहू लागल्याने जवळपास २ कि. मी. पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच पुराच्या पावसाने शेतीत काम करणाऱ्या शेतकर्याना रोखून धरले. परंतु पाऊसामुळे आखाडे पाण्यात आल्याने जीव वाचविण्याच्या भीतीने शेतकरी, मजुरांनी घराची वाट धरली. मात्र घर गाठताना पुलावरून मार्ग काढण्यासाठी टोंगळ्या एवढ्या पाण्यातून एकमेकांना लहान - सहानं पुलावरून साखळी पद्धतीने एकमेकाला धरून घर गाठावे लागले. या पावसाने जवळगाव येथील महावितरण कार्यालय, मोबाईल टॉवर व गावातील रस्ते आणि अनेक घरे पावसाच्या पुराणे व्यापल्याने जिकडे - तिकडे पाणीच पाणी दिसत होते. तसेच हिमायतनगर शहराजवळील रेल्वेस्थानक व भोकर - नांदेडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाच्या अर्धवट कामामुळे हा रस्ता बंद झाला होता. दरम्यान रेल्वे स्थानक अंडर ब्रिज रस्त्याजवळील पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाताहतूक ठप्प झाली होती. येथील भाजप कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन या रस्त्याची वाहतूक मोकळी करून देण्यासाठी प्रयत्न केले.
हदगाव रोडवरील खैरगावच्या पुलाजवळील वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी स्वतः उभे राहून रस्ता सुरळीत करून घेण्यासाठी प्रयत्न केले. सायंकाळी रस्ता पूर्ववत होईल असे त्यांनी सांगतले. या सर्व नाल्याचे पाणी वाहून पैनगंगा नदीमध्ये गेल्यामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याने विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरील गांजेगाव आणि सहस्त्रकुंड जवळील बिटारगावकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी जात असल्याने विदर्भ - मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. दरम्यान आज झालेल्या पावसाने १०० मिलिमीटरचा आकडा पार केला असल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे.

२० गावांचा संपर्क तुटला..
हिमायतनगर तालुक्यात तिसरा दिवशी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, नदी - नाल्याच्या काठावरील पाणी बांध फोडून काठावरील शेतात गेल्याने उभारी घेऊ पाहत असलेली पिके पुन्हा पाण्यात आली आहेत. पावसामुळे जवळगाव, घारापूर, विरसनी, टेंभी, सवना, अन्देगाव, जीरोणा, एकघरी, वाशी, गणेशवाडी, महादापूर, जिरोणा, कार्ल, पिछोन्दी, सिबदरा, मंगरूळ, वारंगटाकळी, धानोरा, सिरंजनी, एकंबा, सिरपल्ली, शेलोडा, पळापसुर, पार्डी, आदींसह हिमायतनगर शहरातील पुलावरून पाणी जात असल्याने जवळपास २० ते २५ गावाचा कहितास संपर्क तुटला होता. पाऊस ओसरल्यानंतर सायंकाळी ५ वाजता वाहतूक सुरळीत झाली असली तरी नदी, नाले, ओढे बंधारे तुडुंब भरून वाहत होते. रेल्वे उड्डाण पुलाच्या खालील रस्त्यावर पाणी वाहत असल्याने अनेक मार्ग अजूनही बंद आहेत.

अनेकांच्या घरात व शेतीत पाणी घुसल्याने पुन्हा शेतकरी व गरीब, सामान्य नागरिक नुकसानीच्या गर्तेत सापडला असून, पावसाची संतधार अशीच सूर राहिली तर हिमायतनगर व ग्रामीण भागातील जुन्या इमारती व घरांच्या भिंती पाण्यामुळे भिजून जमीनदोस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच आजच्या पावसाने शेतकरी, मजुरदार, व्यापारी नौकरदार आदीजनांना हैराण करून सोडले. एकूणच आजच्या पावसाने शेतकरी, मजुरदार, व्यापारी नौकरदार आदीजनांना हैराण करून सोडले. हदगाव -हिमायतनगर तालुक्याला अतिवृष्टीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने भरपाईसाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकरी, नागरीकातून केली जात आहे.
