नांदेड। पंधराव्या महिन्यात सदोतीस भणंगाचा कायापालट करताना धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व त्यांच्या टीमने भ्रमिष्ट अवस्थेत फिरणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरचे मन परिवर्तन करून स्वखर्चाने लुधियाना जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी पाठवून घरवापसी केली.
भाजपा महानगर नांदेड व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघाच्या वतीने धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर हे दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कायापालट उपक्रम राबवितात. पंधरा महिन्यात आतापर्यंत साडेपाचशे पेक्षा जास्त भणंग अवस्थेत फिरणा-यांची कटिंग दाढी केल्यानंतर स्नान घालून नवीन कपडे व प्रत्येकी शंभर रुपयाची बक्षिसी देण्यात आली आहे.या सोमवारी कायापालट उपक्रमा दरम्यान एक व्यक्ती इंग्रजीत स्वतःच्या मनाशी पुटपुटत असल्याचे निदर्शनास आले. त्याची आस्थेवाईक पणे चौकशी केली असता तो लुधियाना जिल्ह्यातील जल्ला या गावचा असल्याचे कळाले.
तो स्वतः एमबीबीएस डॉक्टर होता व त्याची पत्नी सुद्धा अमृतसर शासकीय रुग्णालयात नेत्रतज्ञ म्हणून सध्या कार्यरत आहे. दोघात बनाव झाल्यामुळे घटस्फोटाचा खटला सुरू आहे. या घटनेचा विपरीत परिणाम डोक्यावर होऊन गेल्या सहा महिन्यापासून डॉ. चमनसिंग हे नांदेडमध्ये बेवारस अवस्थेत फिरत होते. दिलीप ठाकूर यांनी त्यांच्या पत्नीशी संपर्क साधला पण तिने काही रिस्पॉन्स दिला नाही. त्यानंतर त्यांच्या आई प्रीतमकौर यांच्याशी संपर्क साधल्यानंतर योग्य प्रतिसाद मिळाला. त्यामुळे लुधियाना येथील सामाजिक कार्यकर्ते सरदार कुलदीपसिंघ यांना माहिती देऊन सदर डॉक्टरांना रेल्वे तिकीट काढून व खर्चासाठी पैसे देऊन सचखंड एक्सप्रेस मध्ये बसविण्यात आले. आजूबाजूच्या प्रवाशांना व टीसीला त्याची माहिती देऊन रस्त्यात कुठेही उतरू देऊ नका यासाठी लक्ष ठेवण्याची विनंती केली. त्यांना घेण्यासाठी लुधियाना स्टेशनवर कुलदीपसिंघ हे स्वतः उपस्थित राहून डॉक्टरांना त्यांच्या मूळ गावी नेऊन सोडणार आहेत.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या संदेशानुसार खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले व लायन्स प्रांतपाल दिलीप मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील तळागाळातील लोकांसाठी कायापालट राबविण्यात येतो. बालाजी मंदिर परिसरात सोमवारी सकाळी सहा वाजता कायापालट सुरू झाला. शहरातील सर्व रस्त्यात फिरून अरुण काबरा, कामाजी सरोदे, सुरेश शर्मा, संजयकुमार गायकवाड यांनी आपल्या वाहनावर ध्रमीष्ठाना बसवून आणले. स्वंयसेवक बजरंग वाघमारे यांनी सर्वांची कटिंग दाढी केली. स्नानासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था बालाजी मंदिरचे महंत कैलास महाराज वैष्णव यांच्यातर्फे करण्यात आली होती. कित्येक महिने अंघोळ न केलेल्या या भ्रमिष्टांना साबण लावून स्नान घालण्यात आले.स्वच्छ होऊन नवीन कपडे घातल्यामुळे त्यांच्या दिसण्यात अमुलाग्र बदल झाला होता .सर्वांच्या चहा फराळाची व्यवस्था करण्यात आली.
चार तास सुरु असलेल्या कार्यक्रमानंतर बालाजी मंदिरचा परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड. चिरंजीलाल दागडिया, ओमकार यादव, बालाजी जाधव यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाला आकाशवाणी उद्बोधक राजीव मिरजकर, गीता परिवाराच्या नीता दागडिया, डॉ. प्रकाश शिंदे, अशोक राठी यांनी सदिच्छा भेट दिली. एखादा उपक्रम सुरु करणे सोपे असते परंतु सातत्याने तो चालू ठेवण्याचे अवघड काम संयोजक दिलीप ठाकूर हे करत असताना एका डॉक्टरची घरवापसी केल्याबद्दल त्यांचे व त्यांच्या टीमचे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.१ जुलैला दिलीप ठाकूर हे १०५ यात्रेकरू समवेत एकोणिसाव्या अमरनाथ यात्रेला जाणार असल्यामुळे जुलैच्या पहिल्या सोमवार ऐवजी गुरुवार दि. ३० जून रोजी सकाळी सहा वाजता कायापालट हा उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.