हिमायतनगर शहरात चोऱ्यांचे सत्र सुरु....
सोन्याचे दागिने व रक्कम लंपास
हिमायतनगर(प्रतिनिधी)शहरात चोरट्यांनी धुमाकूळ माजविला असून, त्यांना पकडण्यात पोलिस असमर्थ ठरत असल्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढत आहे. मंगळवारी दि.२३ च्या मध्यरात्रीला शहरातील उच्चभ्रू वस्तीतील एकाचे घर फोडून कपाटातील लाखोचे सोन्या चांदीचे दागिने व नगदी रक्कम लंपास केल्याने शहरवासियात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या अकार्यक्षमतेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मंगळवारच्या मध्यरात्रीला १.३० ते २ वाजेच्या सुमारास चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी हिमायतनगर शहरातील दत्त नगर या उच्चभ्रू वस्तीत धुमाकूळ माजविला. या ठिकाणी भाड्याने राहत असलेले श्री देवसरकर यांच्या घरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, परंतु येथे काहीच आढळले नाही. त्यानंतर बाजूच्या घरात भाड्याने राहणारे विहिपचे किनवट जिल्हामंत्री किरण बिच्चेवार यांच्या दाराच्या कुलुपाची कडी तोडून आत प्रवेश केला. लाकडी अलमारीत ठेवलेले ३.५ तोळे सोने अंदाजे १ लाख २ हजार २०० रुपये आणि २७ हजार रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. तसेच चोरट्याने यांच्या घरातील एलसिडी नेण्याच्या उद्देशाने काढून ठेवली. एवढेच नव्हे तर श्री बिच्चेवार यांनी मागील काळात गोरक्षनाचे सुरु केलेले कार्य याबाबत वरिष्ठ पातळीपर्यंत केलेल्या तक्रारीच्या फायली असलेली सुटकेस काढून कागदे चाळण्यात आल्याचे दिसून आले आहे. यावेळी श्री बिच्चेवार कुटुंब आपल्या मूळ सरसम बु. गावी गेलेले होते. तर गेल्या चार दिवसापासून हिमायतनगर शहरातून कत्तलीसाठी गोवंश प्रकरणामुळे चार दिवसापासून ते हिमायतनगर येथील घरी नव्हते. त्यामुळे कोणीतरी पाळत ठेवून चोरी केली असावी अशी शंका त्यांनी व्यक्त केली. चोरीत सोन्याचे दागिने व रक्कम गेली याची खंत नाही. परंतु हि सर्व कागदपत्रे काढून पाहण्याचा चोरट्यांचा नेमका काय..? उद्देश होता असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
------------------------------ ----
गेल्या सह महिन्यापूर्वी एका घरी चोरी झाली. त्या घराकडे जाणारे सीसीटीव्ही फुटेज मध्ये तीन चोरटे हातात लोखंडी साहित्य घेऊन जाताना दिसले. त्यात दोघांच्या तोंडावर मुसक्या तर एकच चेहरा दिसत आहे. परंतु चोरट्यांचा अद्याप शोध लागला नाही. त्यानंतर गेल्या महिन्यात एकाच दिवशी पाच ठिकाणी चोरी झाली होती, चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या नागरिकांचे मन विचलित करण्यासाठी चोरट्यांनी एका घराला आग लावली होती. यानंतरही लहान - मोठ्या चोरीचे सत्र सुरूच असून, अद्याप एकही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरीकातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, तातडीने चोरट्यांचा शोध लाऊन, रात्रगस्त वाढवावी आणि नागरिकांना सुरक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे.
सायरन देतो चोरट्यांना सतर्कतेचे इशारा
------------------------------ ---
चोरीच्या घटनेवरून जो तो पोलिसांच्या विरोधात बोलून तोंड सुख घेत असून, पोलिसांची गस्त सायरन लावून केली जाते. त्यामुळे चोरी करणाऱ्या चोरट्यांना सतर्क होण्याची संधी मिळत आहे. एखाद्यावेळी चोर रात्रीला दिसल्यावर पोलिसांना संपर्क केला तर येण्यास उशीर केला जातो. तर कधी मी बाहेर आहे, दुसर्या कोणाला तरी पाठवितो असे सांगितले जाते. आणि थेट जोरात सायरन वाजवीत वाहनातून गस्त केली जाते. हि गस्त नागरिकांना काय..? सुरक्षा देणार असे बोलून दाखवून चोरटे व पोलिस यांचे साठेलोटे आहे कि काय..? अशी शंका नागरिकांनी उपस्थित केली आहे.