सहस्रकुंड धबधबा खळखळू लागला
हिमायतनगर(उत्कर्ष मादसवार)नांदेड - किनवट राज्य रस्त्यावरील हिमायतनगर पासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या रामायणकालीन इतिहासाची साक्ष देणारा सुप्रसिद्ध सहस्रकुंड बाणगंगा धबधबा खळखळ वाहू लागला आहे.
मृग नक्षत्रात झालेल्या दमदार पावसाने आणि कयाधू नदी दुथडी भरून वाहू लागल्याने विदर्भ - मराठवाडा सीमेवरून वाहणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा खळखळ वाहू लागला आहे. रामायण कालीन अख्याईका असलेल्या या नैसर्गिक धबधब्याचे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची पाऊले या दिशेने वळत आहेत. मागील चार वर्षा नंतर पहिल्यांदाच जून महिन्यात सहस्रकुंड धबधबा वाहत आहे. १०० ते १५० फुटावरून पडणारा धबधबा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या विहंगम दृश्याचा आनंद पर्यटक ८० फुट उंचीच्या मनोर्यावरून घेत आहे. तर संपूर्ण परिसर देखील हिरवाईने नटला असून, या धबधब्याच्या काठावर पुरातन कालीन महादेव मंदिर आहे. या ठिकाणी श्रावण मास, दर सोमवारी दर्शनसाठी भक्त येतात. मात्र अद्याप या ठिकाणी पोलिस अथवा मंदिर प्रशासनाने सुरक्ष गार्ड तैनात केला नसल्याने दुर्घटनेची शक्यता बळावली आहे.