सोयाबीन - कापसाची कवडीमोल दारात खरेदी ..शेतकऱ्यांची लुट सुरूच ..
हिमायतनगर(अनिल मादसवार)अवघ्या ४ दिवसावर दिवाळीचा सन येवून ठेपला असून, खरीप हंगामात झालेल्या पावसाच्या अवकृपेने हवालदिल झालेला शेतकरी तोकड्या प्रमाणात निघालेली उत्पादने बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. मात्र येथेही व्यापार्यांनी शेतकर्यांना वेठीस धरण्यास सुरुवात केली असून, शेतकऱ्यांचे पांढरे सोने, सोयाबीनची कवडीमोल दराने खरेदी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याजोगा प्रकार केला जात आहे. या प्रकाराकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकर्यांमधून होत आहे.
निसर्गाचा कोप आणि सत्ताधारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उदासिनता याचा पुरता फटका शेतक-याला बसला असून पावसाच्या अवकृपेमुळे नुकसानीत आलेल्या शेतकर्यांनी हाती आलेल्या पिकांच्या उत्पादनावर सध्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे ठरविले आहे. त्यापैकी कापूस, सोयाबीनचे निघालेले तोकडे उत्पादन बाजारात विक्रीसाठी आणली जात आहेत. याच संधीचा फायदा घेऊन येथील भुसार व्यापार्यांनी कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या अभयामुळे शेतकर्यांना विविध कारणे सांगून सोयाबीन प्रतिक्विंटल ३००० ते ३१०० रुपये दराने खरेदी करत आहेत. तर कापसाची खरेदी करताना कापूस ४००० ते ४१०० रुपये दराने खरेदी केली जात आहे. मुग - ५५०० आणि उडीद ४००० ते ४५०० रुपये दराने खरेदी होत आहे. परिणामी अगोदरच घटलेल्या उत्पन्नाने नुकसानीत आलेला शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. ऐन दिवाळीत घरी येणाऱ्या पाहुण्यांची काय सोय करावी या विवंचनेत सापडला आहे. निसर्गाच्या अवकृपेने झालेले नुकसान व आता कवडीमोल दराने होत असलेल्या खरेदीमुळे शेतकयांच्या उत्पादनाचा खर्चही निघेल कि नाही..? हि चिंता शेतकर्यांना सतावित आहे.
परिणामी दिवाळीनिमित्त माहेरी येणाऱ्या लेकीबाळीची दिवाळी अंधारातच साजरी करण्यावाचून दुसरा पर्याय राहिला नाही अश्या जळजळीत प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून समोर येत आहेत. खरीपात पेरणीवर झालेला खर्च, करावी लागलेली दुबार - तिबार पेरणी, पावसाअभावी खराब झालेली पिके, यामुळे शेतक-यांना प्रती बॅग ७ ते १० हजार रुपयांचा खर्च करावा लागला. मात्र उत्पादन हाती आले तेंव्हा मालाला भाव मिळत नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराकडे पणन महासंघ व कृषी उत्त्पन्न बाजार समितीने लक्ष देवून सोयाबीनला प्रतिक्विंटल ४५०० ते ५००० हजार व कापसाला प्रतिक्विंटल ७००० ते ८००० रुपये भाव द्यावा अशी रास्त अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.