आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाच्या ४ हजार ७०० विशेष गाड्या - परिवहन मंत्री अनिल परब -NNL

दि.६ ते १४ जुलै २०२२ दरम्यान धावणार गाड्या; वाखरी येथील रिंगण सोहोळ्यासाठी २०० बसेस उपलब्ध


मुंबई|
आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाच्या सुमारे ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.

मंत्री श्री.परब म्हणाले, दिनांक  ६ ते १४ जुलै, २०२२ दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी दि.८ जुलै रोजी २०० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती येथून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून पंढरपूर येथे जाणारे वारकरी तसेच भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. परब यांनी केले.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आषाढीनिमित्त पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या पालख्यांचा सोहळा साधेपणाने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. कोरोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील मानाच्या पालख्या बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एसटी महामंडळाने विशेष बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. दोन वर्षांनंतर यंदा वारी सोहळा होणार आहे. यामध्ये एसटीच्या प्रवासी वाहतुकीला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे गावी आणून सोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी एस टी महामंडळावर आहे. त्याकरिता या गाड्या सोडण्यात येणार असल्याचे श्री. परब यांनी यावेळी सांगितले.

विशेष गाड्यांचे नियोजन - यात्रेसाठी औरंगाबाद - १२००, मुंबई - ५००, नागपूर - १००, पुणे - १२००, नाशिक - १००० तर अमरावती येथून ७०० अशा प्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

चार तात्पुरती बस स्थानके उभारणार - पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा  काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक… अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत. अधिकाधिक भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बसस्थानकांचे नियोजन- पंढरपूर यात्रेसाठी येणाऱ्या व जाणाऱ्या भाविकांसाठी पुढीलप्रमाणे बस स्थानके व जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

बस स्थानक आणि जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेसखालील प्रमाणे

१.         चंद्रभागा बसस्थानक       -           मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार

२.         भिमा यात्रा देगाव            -           औरंगाबाद, नागपूर व अमरावती प्रदेश

३.         विठ्ठल कारखाना             -           नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर

४.         पांडुरंग बसस्थानक         -           सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग

            याप्रमाणे बस सेवासुरू करण्यात येणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी